वृत्त क्र.786
उस्मानाबाद.दि.14:- जिल्हात शाश्वत पाणी स्त्रोत निर्माण करुन जिल्हा टँकर मुक्त, टंचाई मुक्त व दुष्काळ मुक्त करण्यासाठी दि. 15 ते 23 ऑक्टोबर 2016 दरम्यान कंत्राटदार व लोकसहभागातून वनराई बंधारे अभियान राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्हा गेल्या चार-पाच वर्षापासून दुष्काळाचे सावट होते, यावर्षी दमदार पाऊस झाल्याने जिल्हयातील अनेक प्रकल्प, ओठे, नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. त्यामुळे हे पाणी वाहून जात असल्याने त्या ठिकाणी कंत्राटदार व लोकसहभागातून वनराई बंधारे बांधले तर शाश्वत पाणी स्त्रोत निर्माण होऊन जिल्हा टंचाई व टँकरमुक्त व दुष्काळमुक्त होईल. त्यामुळे जिल्हयात दि.15 ते 23 ऑक्टोबर दरम्यान पाच हजार वनराई बंधारे बांधण्याचे उदिष्ट असून यामुळे 250 द.ल.घ.फूट पाणीसाठा होऊन कमीत कमी तीन हजार हेक्टर क्षेत्र बागायतीखाली येऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुध्दा मिटण्यास मदत होणार आहे.त्यामुळे दि.23 ऑक्टोबर 2016 पर्यंत वनराई बंधारे अभियान राबवून उदिष्टपूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी केले आहे.