उस्मानाबाद.दि.4:-
ग्रामस्तरावर ग्राम संपर्क अधिकारी हा त्या गावाचा
पालक अधिकारी असल्याने त्या गावातील सर्व विकासात्मक कामांची जबाबदारी त्यांच्यावर
असून त्याची गावाशी नाळ जोडली गेली पाहिजे, असे डॉ. भापकर यांनी सांगितले.गाळमुक्त
धरण, गाळयुक्त शिवार ही योजना राबवून जमिनीची पोत वाढवून शेतीला सुपीक बनवा, असे आवाहन विभागीय आयुक्त
डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी आज येथे केले.
जिल्हयातील कृषी, ग्रामीण, महसूल,सिंचन,आरोग्य,बांधकाम, शिक्षण या
विभागाच्या ग्रामस्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंतच्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी
छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृह,नगरपरिषद उस्मानाबाद येथे कार्यशाळेचे आयोजन
करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद
रायते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील,अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक,विभागीय
आयुक्त कार्यालयातील उपायुक्त डॉ.विजयकुमार फड, श्री.पारस
बोथ्रा,श्री.पटवारे,श्री. कुंभार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, अतिरिक्त
मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,प्रभोदय
मुळे,अरविंद लाटकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,उपविभागीय अधिकारी, उप विभागीय कृषी
अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, सर्व
कृषी सहाय्यक, सर्व ग्रामसेवक, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी,
सर्व मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत असे विविध विभागांचे प्रमुख व त्यांचे
सहाय्यक अधिकारी आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. भापकर म्हणाले की, मनरेगा च्या
योजना राबविण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य मागे आहे,त्यामुळे मनरेगा योजनेची
अमंलबजावणी ग्रामस्तरावर मोठया प्रमाणात होणे गरजेचे आहे.महाराष्ट्राने मनरेगाच्या
बाबतीत देशाला दिशा देण्याचे काम केले
आहे.परंतु आज खर्चाच्या बाबतीत इतर राज्याच्या मानाने आपले राज्य मागे
आहे.मनरेगावर राज्यात जेवढा खर्च होतो त्यातील सर्वात जास्त मराठवाडयात होणे
गरजेचे आहे, कारण या भागाची ती आवश्यकताच आहे.
मनरेगा
अंतर्गत महाराष्ट्र शासनाने स्वतंत्रपणे समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना सुरु
केली असून ह्या अकरा कलमी कार्यक्रमांतील मागेल त्याला शेततळे, वृक्षरोपण, वृक्षसंवर्धन,
जलयुक्त , कर्ज पुनर्गठन, स्वच्छता मोहीम आदि वैयक्तिक लाभाचे उपक्रम हाती घेतले
असून याअंतर्गत 80 टक्के लाभार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचे डॉ. भापकर यांनी
सांगितले.
कृषी विभागात,
सामाजिक वनीकरण, वन विभाग या विभागांना रोहयोची कामे सुरु करण्याचे प्रशासकीय व
तांत्रिक अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ह्या सर्व विभागांनी मोठ्या
प्रमाणावर रोहयोची कामे हाती घेणे आवश्यक असल्ल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनरेगाची कामे सरपंचापासून ते उपजिल्हाधिकारीपर्यंत सर्वच अधिकारी
व कर्मचारी यांनी पूर्ण करावीत.योग्य नियोजन करावे, 100 टक्के उद्दिष्ट साध्य
करावे, नाहीतर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,असा सज्जड इशाराही डॉ. भापकर यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज
नाट्यगृहात झालेल्या या आढावा बैठकीत डॉ.भापकर यांनी मागेल त्याला शेततळे,जलयुक्त
शिवार अभियान,वृक्षारोपण,स्वच्छ भारत मिशन,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान,7/12
संगणकीकरण,स्वस्त धान्य दुकानाच्या ईपॉज मशिन व ईपीडीएस यासंबंधीचा तपशिलवार आढावाही
घेतला.
या कार्यशाळेत उपायुक्त डॉ.विजयकुमार फड तसेच श्री. पारस बोथ्रा
यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हयात विविध
उपक्रमांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा विभागीय आयुक्त डॉ. भापकर
यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात लोहारा
तालुका हागणदारीमुक्त करून
जिल्हयातील पहिला तालुका
ठरला याबद्दल गट विकास अधिकारी
क्रांती बोरटे यांचा ,चालू महिन्यात सुमारे 400 शौचालये बांधकाम
एकाच वेळी सुरू
करून जिल्हयात उत्कृष्ट काम करीत असल्यामुळे गट विकास अधिकारी श्री. चकोर यांचा ,याशिवाय लोकसहभागातून 5 हजार
222 वनराई बंधारे जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी पूर्ण करून आपलाच पूर्वीचा जिल्हा विक्रम मोडीत काढला, त्यात जिल्हा परिषद
लघुसिंचन विभागाने उत्कृष्ट काम केल्याबद्दल
कार्यकारी अभियंता श्री. जगताप यांचा ,यानंतर जिल्हयातील 621
ग्रामपंचायतीपैकी 619 ग्रामपंचायतीने
लेखा परिक्षणासाठी वेळेवर
अभिलेखे उपलब्ध करून दिले व
विभागात जिल्हा अव्वल राहिला
याकरिता ग्रामसेवक संघटनेचे
श्री. तांबोळी ,जलयुक्त शिवार अभियानामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल कृषी
सहाय्यक नवनाथ अलमले यांचा समावेश होता.
कार्यशाळेच्या उदघाटनानंतर
जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी प्रास्ताविक केले तर शेवटी आभार अप्पर
जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी मानले.