Tuesday, 10 January 2017

पत्रकार दिनानिमित्त तसेच “बळीराजा चेतना अभियानांतर्गत”




शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा पत्नींचा पत्रकार आणि शासकीय अधिकारी यांच्याशी सुसंवाद तसेच आरोग्य शिबिर संपन्न
उस्मानाबाद, दि.10:- काम करताना शिस्त ही महत्वाची बाब आहे . आपण ज्या संस्थेसाठी काम करतो तेथे अतिउत्कृष्ट पध्दतीने काम केले पाहिजे जेणेकरुन आपण त्या संस्थेची संपत्ती बनलो पाहिजे. शासकीय योजना या  सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे यासाठी प्रत्येक शासकीय विभाग अहोरात्र कार्यरत असते, त्यासाठी जिल्हाधिकारी या नात्याने  कोणाला प्रेमाने सांगून,काहींना नियम दाखवून तर काहींना रागावून या  योजनांवर अंमलबजावणी  करण्यासाठी प्रवृत्त करत असतात, असे  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  आज जिल्हा‍ नियोजन समिती सभागृहात आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उपस्थितांना मार्गदर्शन केले .
दिनांक ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकरांनी रोवली. मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून  सर्वत्र साजरा केला जातो.
यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील  विधवा पत्नींना शासकीय योजनांची  माहिती व्हावी या हेतूने या महिलांचा जिल्हयातील प्रमुख शासकीय विभागांच्या विभागप्रमुख तसेच पत्रकारांसोबत सुसंवाद आणि या सुसंवादानंतर उपस्थित सर्वांची आरोग्य तपासणी हे उपक्रम जिल्हा नियोजन सभागृह,मध्यवर्ती  प्रशासकीय इमारत येथे राबविण्यात आले .
प्रथम दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली . प्रास्ताविकामध्ये जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांनी पत्रकार दिनाचे  व या  कार्यक्रमाचे महत्व उपस्थितांना सांगितले .
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे,उप जिल्हाधिकारी श्रीमती शिल्पा करमरकर,श्रीअरविंद लाटकर,जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. कोंडेकर, श्री. रुकमे ,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  श्री. शिरीष जमदाडे , जिल्हा कोषागार अधिकारी  श्री. विशाल पवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  श्री. कांबळे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती वृषाली तेलोरे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शितलकुमार मुकणे, नेहरू  युवा केंद्राचे लेखाधिकारी श्री. विकास कुलकर्णी, उप शिक्षणाधिकारी (प्राथ)श्रीमती रोहिणी कुंभार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे श्री.सोमनाथ लामगुडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गलांडे, डॉ. देशपांडे, वन विभागाचे (आरएफओ) श्री. म्हेत्रे , श्री.सावळे, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्री. विनायक कोठारी आदी तसेच जिल्ह्यातील पत्रकार आणि सेव्ह फार्मर्स विडोज या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शिला उंबरे, संयोजिका महानंदा पहलवान आणि  जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त  शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी व वारस यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
            या उपक्रमांतर्गत उपस्थित सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाची लोकोपयोगी योजनांची माहिती उपस्थितांना विस्तृत सादरीकरणाद्वारे दाखविली.यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी आणि इतर महिलांनी या अधिकाऱ्यांशी सुसंवाद साधून  विविध शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली .
            यावेळी आयोजित आरोग्य शिबिरात 111 जणांची बी.पी.,मधुमेह तपासणी,11जणांची एचआयव्ही तपासणी, 2 जणांची ईसीजी तर 5 जणांचे डोळे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गायकवाड, अधिपारिचारिका श्रीमती कविता चाकाटे , श्रीमती नानेकर, प्रयोग शाळा तंत्रज्ञ श्री. सचदेव शिरसाठ, श्री. लक्ष्मीकांत मुंडे, समुपदेशक श्री.सुधीर कावळे यांनी तपासले .
            यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने  उपस्थितांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री, आशिष लगाडे  तर आभार  जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप यांनी मानले .

****