Wednesday, 27 September 2017

आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियानांतर्गत रॅली संपन्न


उस्मानाबाद,दि.27:- महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियानानिमित्त जिल्हाधिकारी  तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीचे आयोजन सकाळी 9.30 वाजता शहरातील बार्शी नाका येथून निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या हस्ते  हिरवा झेंडा  दाखवून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला.
शासनाच्या सूचनेनुसार दि. 27 सप्टेंबर 2017 रोजी आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच लोकजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस विभागाच्या वतीने शांताराम वाघमोडे राखीव पोलीस दल यांच्या सहकार्याने वज्रवाहन, दंगल नियंत्रक पथक, आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.एकनाथ माले व कर्मचारी प्रशिक्षणार्थी, शरद पवार हायस्कूल, समता विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, नगर परिषदेचे अग्निक्षमन दल वाहन व कर्मचारी, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक आदीसह खेळाडू या रॅलीत सहभागी झाले होते.

या रॅलीची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली, यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती वृषाली तेलोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजनाबाबत माहिती दिली व उपस्थितांचे आभार मानले.