Sunday, 24 September 2017

नवरात्रौ महोत्सवात नगरपालिकेचे चोख व्यवस्थापन


          उस्मानाबाद, दि.24: शारदीय नवरात्र महोत्सवाच्या प्रारंभापासून  नगर पालिका प्रशासनाकडून  नियोजनात्मक आराखडयानुसार जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थान अध्यक्ष        श्री. राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली  नगरपालिका प्रशासनाने चोख व्यवस्थापन केले आहे. नवरात्र महोत्सवात भाविकांनी मोठी गर्दी होणार असल्याने भाविकांच्या सेवेसाठी न.प.कर्मचारी रात्रंदिवस सेवा करीत आहेत. नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष पंडीत जगदाळे, मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता नगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी तुळजापूर शहर आणि मंदिर परिसर  येथे सतत लक्ष ठेवून आहेत.
          नगरपालिकेने या यात्रा महोत्सव काळात विविध कामांचे नियोजन केले असून  सफाई विभाग नगरपालिकांचे कर्मचारी सतत कार्यरत आहेत. लातूर रोड,वेताळ ते बारालिंग रोड, उस्मानाबाद रोड, घाटशीळ रोड पार्कींग,मोबाईल टॉयलेट,फॉगींग मशीन,मंदीर मागील आराधवाडी भागातील कचरा उचलण्यात आला असून आवश्यतेनुसार जंतुनाशके शहरात विविध ठिकाणी वापरण्यात येत आहेत. नगरपालिकांकडून भवानी मंदिर परिसर,पावणारा गणपती, घाटशीळ रोड पार्कींग, आंबेडकर चौक, शिवाजी चौक, जुने बसस्थानक, नवीन बसस्थानक( लातूर रोड) आणि बाबजी अड्डा या ठिकाणी प्रथमोपचार केंद्रे निश्चित करण्यात आली आहे.
          नगरपालिकेकडून यात्रेकरु भाविकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच विविध ठिकाणी पाणपोईची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शहरातील विविध कुंड, विहीरी इत्यादी पाणीसाठे ब्लिचींग पावडरचा योग्य मात्रा निर्जंतुकीकरण केले आहे. शहरातील हॉटेल व्यावसायिकाचे नमुने पाणी तपासणीची सोय केली आहे. पाणपोई व प्रशासकीय यंत्रणेकरीता पाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
          उस्मानाबाद रोड हायवे रोडवरील पथदिवे संपूर्ण दुरुस्त करुन चालू करण्यात आले आहेत. यात्रा कालावधीमध्ये शहरात आवश्यक ठिकाणी हॅलोजन लावून विद्यूत व्यवस्था करण्यात आली आहे. भवानी मंदिरासमोर, घाटशीळ रोड पार्कींग, आराधवाडी व पोलीस स्टेशन या ठिकाणी अग्निशमन विभागाकडून 4 वाहनांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच प्राधिकरणाकडून दीपक चौक ते आंबेडकर चौक, शिवाजी चौक आदि ठिकाणची अतिक्रमणे काढली आहेत. महाद्वार रोड ते कमानवेस पॅचवर्कचे काम पूर्ण केले आहे. तसेच अग्रवाल बिल्डींग ते आर्य चौक पॅच वर्क चे काम पूर्ण झाले आहे.
          शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आली आहेत. तसेच  शहरातील प्रमुख ठिकाणी बॅरेकेटींग,स्वागत कमानी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शहरात भाविकांना त्रास होणार नाही, याची दक्षता नगरपालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे.