Wednesday, 25 January 2017

विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करावेत


उस्मानाबाद,दि.25:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परीक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांस विभागाच्या https://mahaeschol.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृर्ती अर्ज ऑनलाईन प्रणालीमध्ये भरले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी दि.31 जानेवारी 2017 अखेर पर्यंत अर्ज भरावेत, विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे. 
        ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र,वय,उत्पन्न व रहिवास दाखला, मागील वर्षाचा उत्तीर्ण दाखला इत्यादी कागदपत्रे शाळा, महाविद्यालयास सादर करणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांस मिळणारी शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांच्या  बँक खात्यावर  आणि शिक्षण फी ची रक्कम महाविद्यालयाच्या बँक खात्यावर परस्पर जमा केली जाते. अधिकृत बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होण्यासाठी पुढील बाबीची पूर्तता विद्यार्थी, पालक यांनी त्यांच्या  शाळा, महाविद्यालयाकडे करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
         विद्यार्थ्यांचे आपल्या आधार कार्ड क्रमांकाची खात्री पटविण्यासाठी आधार कार्डची प्रत प्रस्तावासोबत जोडावी, ज्या बँकेमध्ये खाते उघडले आहे,त्या बँकेच्या खाते क्रमांकाची खात्री होण्यासाठी पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी, आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न केले असल्याबाबतचा पुरावा म्हणून बँकेकडून आधार संलग्नता केल्याबाबतची पावती सोबत जोडावी,विद्यार्थी, पालकांनी प्रस्तावासोबत आधार क्रमांक आणि बँकेशी संलग्न केल्याबाबत पुरावा जोडला आहे, अशा विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम तसेच महाविद्यालयाच्या खात्यावर शिक्षण शुल्काची रक्कम प्राधान्याने जमा केली जाईल.

            लाभार्थी विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती ही त्यांच्याच खात्यावर जमा व्हावी व त्या खात्याचा गैरवापर होऊ नये या हेतूने प्रत्येकांना आपला आधार क्रमांक हा बँकेच्या खात्याशी संलग्न करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारची अनियमित्ता व बोगसगिरी करण्यास वाव राहणार नाही, जिल्हयातील सर्व विद्यार्थी, पालक व महाविद्यालयास आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपापल्या बँकेत जावून आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावेत. त्यासाठी आवश्यक तो अर्ज भरून बँकेकडे द्यावा आणि त्या पोच पावतीची प्रत आपल्या स्कॉलरशीप अर्जा बरोबर जोडावी,  ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृर्ती अर्ज ऑनलाईन प्रणालीमध्ये भरले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी दि.31 जानेवारी 2017 अखेर पर्यंत अर्ज भरावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री.शेळके यांनी केले आहे.