Tuesday, 24 January 2017

“बेटी बचाओ, बेटी पढाओ” कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांचा केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते सत्कार


उस्मानाबाद,दि.24:- बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ या केंद्र शासनाच्या अतिशय महत्वाकांक्षी अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबाबत  देशभरातील 10 जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले. या 10 जिल्ह्यांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचाही समावेश होता. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अभियानाचा दुसरा वर्धापन दिन तसेच ‘राष्ट्रीय बालिका दिना’चे औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले. 
यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी, महिला व बाल विकास सचिव लीना नायर, रिओ पॅरा ऑलम्पिक विजेत्या दीपा मलिक, फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी, पद्मश्री गिर्यारोहक अरूनिमा सिन्हा, गिर्यारोहक रेखा चोकन या मंचावर उपस्थित होत्या. यासह दिल्लीस्थित शाळकरी विद्यार्थ्यांनी, महिला व मुलींसाठी कार्यरत गैरसरकारी संस्था, आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत संस्थांचे प्रतिनिधी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्ह्याला कन्या भ्रूणहत्या कायदा कडक अंमलबजावणी करण्यासाठी तसेच ‘आई व शिशु नियंत्रण प्रणाली’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनात हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गंत गावातील लोक, सरपंच, आशा सेविका, एएनएम, अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी यांच्या सहभागाने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर महिलांचे शिबिर आयोजित करण्यात आले. तीन महिने गरोदर असणाऱ्या महिलांचे अंकेक्षण करण्यात आले. पुढील सहा महिन्यांपर्यंत या गरोदर महिलांना लागणाऱ्या औषधी, त्यांच्या चाचण्या शासनाच्या वतीने करण्यात आल्या. यासह गरोदर महिलांच्या कुटुंबातील सदस्यांचे मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले. यामधून जागरुकता निर्माण केली जाते. प्रसूतीनंतरचे पुढील तीन महिनेही नवजात बाळांचे अकेंक्षण केले जाते. यामध्ये नवजात बालकांना या काळात लागणारे लसीकरण केले जाते.
या संपूर्ण अभियानामध्ये जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले,तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक धाकतोडे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे , प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. टी.एच.माने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.जी. मुळे, , डॉ. अशोक थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद गिराम ,डॉ. आर.के.गिरी,  डॉ. मंजुश्री शेळके,डॉ. चाकूरकर, डॉ. श्रीनिवास  जाधव,डॉ.संजय वाळके,डॉ. व्ही.एम. बावरे,डॉ. विवेक होळे, डॉ.विजय सूळ, तहसिलदार व्ही.जे. कडावकर, सरकारी वकील ॲड. वायबसे,ॲड. कुलकर्णी,  ॲड.पाटील,ॲड.व्ही.जी.शिंदे,ॲड.उमा गंगणे,महिला व बालविकास अधिकारी श्री.नवले, शिक्षणाधिकारी (प्राथ) सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (माध्य) औदुंबर उकिरडे, उप शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे,डॉ. फुलारी, डॉ. पांचाळ, डॉ. मिटकरी आणि जिल्हा  कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गाडेकर  या अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.   

या अंकेक्षणाचे तीन भाग पाडण्यात आले. जास्त कन्या भ्रूणहत्या दर असणाऱ्या क्षेत्राला लाल रंग देण्यात आला आहे. त्यापेक्षा कमी कन्या भ्रूणहत्या असणाऱ्या क्षेत्राला पिवळा रंग देण्यात आला आहे आणि सर्वाधिक कमी कन्या भ्रूणहत्या असणाऱ्या क्षेत्राला हिरवा रंग देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे मुलींचा जन्मदर वाढला आहे. वर्ष 2015 मध्ये 1 हजार मुलांमागे 791 मुली होत्या हा आकडा वाढून 2016 मध्ये 904 एवढा झाला आहे.
याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील 10 कन्या भ्रूणहत्या करणाऱ्या संस्थेवर कार्यवाही करण्यात आली असून 6 लोकांना या अंतर्गंत शिक्षाही ठोठावण्यात आली  आहे.


****