उस्मानाबाद,दि.6:-
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना विकास कार्यक्रमात सहभागी करुन घेण्याकरीता
पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेच्या सद्य:स्थितीतील स्वरुपात व निकषात बदल
करुन या योजनेचे रुपांतर करुन "स्मार्ट ग्राम" योजना सुरू करण्यात आली
आहे. या योजनेत तालुका व जिल्हास्तरावरील गावांना पुरस्कार दिले जाणार आहेत, तरी
जिल्हयातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन
जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत विभाग) श्री. अजिंक्य पवार यांनी
केले आहे.
या योजनेत मोठया ग्रामपंचायती, शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायती, पुरस्कार
प्राप्त ग्रामपंचायती, उर्वरीत ग्रामपंचायती अशी विभागणी केली जाणार आहे. पर्यावरण
संतुलित योजनेचे रुपांतर या योजनेत करण्यात आले आहे.
योजनेचे निकषही बदलण्यात आले आहेत. योजनेच्या प्रथमस्तरावर ग्रामपंचायतींनी स्वयंमुल्यांकन
करुन त्यांचे प्रस्ताव संबंधित पंचायत समिती कार्यालयात सादर करायचे आहेत,
त्यानंतर तालुकास्तरावर समितीकडून या गावांची तपासणी होणार आहे.
तालुकास्तरावर सर्वाधिक गुण प्राप्त ग्रामपंचायत द्वितीय स्पर्धेकरीता पात्र
राहील. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती या
ग्रामपंचायतची तपासणी करणार आहे. त्यानंतर प्रथम स्तरावर निवड झालेल्या
ग्रामपंचायतींना दहा लाख रुपये बक्षीस दिले जाईल, द्वितीय स्तरावर निवड झालेल्या
ग्रामपंचायतींना 40 लाखाचे बक्षीस मिळणार
आहे. प्रथम स्तरावर तालुका स्मार्ट ग्राम म्हणून घोषित करण्यात आलेल्या
ग्रामपंचायतींना प्रजासत्ताक दिनी व
द्वितीय स्तरावर जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून घोषित ग्रामपंचायतींना महाराष्ट्र दिनी बक्षीस वितरण करण्यात येईल, तरी जिल्हयातील जास्तीत जास्त गावांनी या
योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.