Wednesday, 29 July 2026
यादीतील रकमेबाबत संभ्रम नको ; आधार प्रमाणीकरणानंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रसिद्ध रक्कम योग्यच
यादीतील रकमेबाबत संभ्रम नको ; आधार प्रमाणीकरणानंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ
शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रसिद्ध रक्कम योग्यच
धाराशिव,दि.२९ जुलै (जिमाका) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या लाभार्थी यादीतील कर्जमाफीच्या रकमेबाबत शेतकऱ्यांनी संभ्रम बाळगू नये.प्रसिद्ध यादीतील रक्कम ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एन.पी.ए.(हेअरकट) धोरणानुसार दर्शविण्यात आली असून,प्रत्यक्ष आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्यांना पात्रतेनुसार संपूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,धाराशिव यांनी केले आहे.
शासनाने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ जाहीर केली असून,तिची अंमलबजावणी शासनस्तरावर सुरू आहे.त्यानुसार २५ जुलै २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्यातील ४७ हजार ८८६ शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.ही यादी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून, आणखी ५० ते ५१ हजार शेतकऱ्यांची यादी पुढील १५ दिवसांत प्रसिद्ध होणार आहे.
प्रसिद्ध यादीतील काही शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम कमी दिसत असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत.याबाबत प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एन.पी.ए.तारखेवरील हेअरकट धोरणानुसार यादीतील रक्कम दर्शविण्यात आली आहे.त्यामुळे ती संबंधित बँकेच्या कर्जखात्यातील प्रत्यक्ष थकबाकीपेक्षा कमी दिसू शकते.
मात्र,शेतकरी ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करताच पोर्टलवर ३१ जुलै २०२६ रोजी येणे बाकी असलेली संपूर्ण पात्र कर्जरक्कम दिसून येते.तसेच त्या रकमेची नोंद असलेली प्रमाणित प्रतही शेतकऱ्यांना दिली जाते.प्रसिद्ध यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणानंतर रुपये २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ प्रसिद्ध यादीतील रक्कम पाहून कोणताही निष्कर्ष काढू नये.यादीवरील विशिष्ट क्रमांक, स्वतःचा अॅग्रीस्टॅक क्रमांक आणि आधार कार्ड घेऊन ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर जावे.तेथे आपल्या कर्ज खाते क्रमांकाची, कर्ज रकमेची व आधार क्रमांकाची खात्री करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून कर्जमाफीची रक्कम मंजूर होणार असून,त्यानंतर संबंधित शेतकरी पुढील कर्ज घेण्यासाठीही पात्र ठरणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,धाराशिव यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान,कर्जमुक्ती योजनेच्या यादीत नाव तपासणे,अपात्रतेची कारणे जाणून घेणे,तक्रारींचे निराकरण तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शासनाने (०२२) ४९१५०८०२ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.या हेल्पलाईनवर संपर्क साधूनही शेतकरी आपल्या शंकांचे निराकरण करून घेऊ शकतात.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता ‘आपले सरकार’ सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,धाराशिव यांनी केले आहे.
******