Thursday, 6 July 2017

वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सर्वांनी वेळेत पूर्ण करावे -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


                                                    
उस्मानाबाद,दि.5:- जिल्हयाचे वृक्षलागवडीचे उद्दिष्ट सर्व विभागानी दिलेल्या वेळेत  पूर्ण करावे व त्याचबरोबर उद्दिष्ठ पूर्ण केल्यानंतर लावलेले वृक्ष जिवंत राहण्यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज केल्या.
                                 जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत कामाचा जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी आढावा बैठक  घेतली. यावेळी ते बोलत होते.यावेळी अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक,विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,उपविभागीय अधिकारी चेतन गिराशे, उपविभागीय अधिकारी निलेश श्रींगी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
                                 वृक्ष लागवडीचे उद्दिष्टये पूर्ण केल्यानंतर ते जिवंत राहण्यासाठी  व त्याचे संगोपन व संरक्षण करण्यासाठी बिहार पॅटर्न राबवा, ज्यामुळे लोकांना रोजगारही मिळेल व वृक्षही जिवंत राहतील,अशा सूचनाही यावेळी  जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी केल्या.
                                 विभागीय वन अधिकारी श्री.सातेलीकर यांनी यावेळी रोपलागवड करण्यापूर्वी रोपांची पिशवी पाण्यात बुडवून लागवड करावी, जलसंजीवनी मिश्रणात (हळद,हिंग,कापूर,सिरेडॅक्सचे द्रावण करुन) रांपोची पिशवी त्यात भिजवून लागवड करण्यात यावी, काही प्रमाणात हायड्रोजेलचा वापर करावा, यामुळे थोडयाशा पावसातही अधिक काळ ओलावा टिकून राहील, असे सांगितले.
            यावेळी कृषी विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, शिक्षण विभाग,महसूल विभाग,ग्रामपंचायत, वन विभाग, सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभागाचा वृक्ष लागवडीचा आढावा घेण्यात आला.