Thursday, 6 July 2017

वृक्ष लागवड ही सामाजिक चळवळ बनली पाहिजे -जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे




उस्मानाबाद,दि.4:- पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड ही सामाजिक चळवळ बनली पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केले.
                                 जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी जिल्हयातील हतलाई मंदिर परिसर, तुळजापूर खुर्द, कामेगाव,पळसप, कळंब तालुक्यातील निपाणी आदी भागात भेट देवून वृक्ष लागवडीची पाहणी केली.यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक वनीकरणाचे सहाय्यक संचालक श्री. मायकलवार, मुख्य वनरक्षक औरंगाबाद श्री. वाघ, विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे,जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, तहसिलदार दिनेश झांपले तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
        हातलाई मंदिर परिसरात वन विभागाने केलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये सन 2001-02 मध्ये या क्षेत्रात वन विभागाने त्यावेळी 15 हेक्टर क्षेत्रात 37 हजार 500, मुख्य रस्ता ते मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड, मंदीर परिसराच्या बाजूस लॉन तयार करुन, लॉनच्या चोहोबाजूस विविध रंगाच्या क्रोटॉनची लागवड, त्यामध्ये विविध पाम प्रजातींची लागवडीची पाहणी करुन तुळजापूर खुर्द येथे  वन विभागाने 20 हेक्टरवर वनीकरणाचा भरगच्च कार्यक्रम योजनेंतर्गत सन 2017 मध्ये लावलेल्या 24 हजार वृक्ष लागवडीची पाहणी केली. त्यानंतर कामेगाव येथील 10 हेक्टर क्षेत्रावर वनीकरणाचा भरगच्च कार्यक्रम योजनेंतर्गत सन 2017 मध्ये लागवड केलेल्या 12 वृक्ष लागवडीची पाहणी केली.त्यानंतर उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथे सन 2014 मध्ये निकृष्ट वनाचे पुर्नवनीकरण योजनेंतर्गत लागवड केलेल्या 37 हजार 500 वृक्ष लागवडीची  पाहणी जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी केली.यावेळी पळसप येथे लागवड केलेल्या शिसू, काशिद, प्लेटोफार्म, करंज,निम,शिरस महोगणी, बकुळ आदी वृक्षाची चांगली वाढ झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पाहणी केलेल्या सर्व ठिकाणी यावेळी जिल्हाधिकारी श्री. गमे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.