Thursday, 20 July 2017

अतिसार नियंत्रण पंधरवाडा प्रभावीपणे राबवावा - जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे


उस्मानाबाद,दि.20:- जिल्हयातील 0 ते 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना ओ.आर.एस. व झिंक गोळया देण्यात याव्यात, त्यामध्ये  विटभट्टी कामगार, झोपडपट्टया, बांधकामाची ठिकाणे व बाहेरच्या जिल्हयातून आलेल्या फिरस्ती पाली यावर विशेष लक्ष केंद्रीत करुन अतिसार नियंत्रण पंधरवाडा प्रभावीपणे राबवावा,अशा सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केल्या.
            अतिसार नियंत्रण पंधरवाडा 01 ऑगस्ट 2017 ते दि. 13 ऑगस्ट 2017 या कालावधीत राबविण्यात येत आहे. सदर मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली.यावेळी ते बोलत होते.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे, आय.एम.ए. संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजगुरु, आय.पी.ए. संघटनेचे अध्यक्ष डॉ. घोगरे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.आर. पांचाळ व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            देशात अर्भक मृत्यूदर व बालमृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 10 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि हया बालमृत्यूंचे प्रमाण उन्हाळयात व पावसाळयात जास्त असते. यामुळे जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या दि.01 ऑगस्ट 2017 ते दि. 13 ऑगस्ट 2017 या कालावधीमधील विशेष अतिसार पंधरवाडात विटभट्टी कामगार, झोपडपट्टया, बांधकामाची ठिकाणे,ग्रामीण भागातील वाडी, वस्तीवरील सर्व ठिकानावर लक्ष केंद्रीत करुन0 ते 5 वर्षाखालील बालकांना ओ.आर.एस. व झिंक गोळया देण्यात याव्यात, असे निर्देश ही जिल्हाधिकारी श्री.गमे यांनी दिले.    

            या मोहिमेंतर्गत जिल्हयामध्ये 0 ते 5 वर्षाखालील ग्रामीण भागात 1 लाख 31 हजार 353 व शहरी भागात 46 हजार 139 अशी एकूण 1 लाख 77 हजार 492 बालके आहेत. मोहीम यशस्वी करण्यासाठी 1 हजार 198 आशा स्वयंसेविका, 482 आरोग्य कर्मचारी, 232 आरोग्य पर्यवेक्षक, 1 हजार 890 अंगणवाडी कार्यकर्ती व 1 हजार 765 अंगणवाडी मदतनीस असे एकूण 5 हजार 567 मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक तालुक्यासाठी जिल्हास्तरीय संपर्क अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. 0 ते 5 वर्षाखालील बालकांना ओ.आर.एस. व झिंक गोळया सर्व स्तरावर देण्यात येणार असून या मध्ये उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, नगरपालीका रुग्णालय या ठिकाणी सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे व या कालावधीत सर्व शाळा व अंगणवाडयांमध्ये हात धुण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी यावेळी  बैठकीत दिली.