उस्मानाबाद, दि.26 :- कारगिल (ऑपरेशन विजय) युध्दात मिळालेल्या विजयास आज 26 जुलै 2017 रोजी सतरा
वर्षे पूर्ण होत असून कारगिल विजयाचा 18 वा कारगिल विजय दिवस म्हणून उस्मानाबाद येथिल स्मृतीस्तंभास जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे, पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पुष्पचक्र
अर्पण करुन पुष्पांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हयातील प्रतिष्ठित नागरीक, युध्दात शहिद झालेल्या जवानांच्या वीरपत्नी, छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थींनी, जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक
विद्यालयाच्या विद्यार्थींनींनी कारगिल विजयी दिनानिमित्त उस्मानाबाद शहरातून रॅली
काढून कारगिल विजयी दिनाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या रॅलीत विद्यार्थ्यांसमवेत विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एम. चव्हाण व सर्व
शिक्षकवृंद यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत युध्दात शहीद
झालेल्या किंवा शौर्य पदक विजेत्या सैनिकांच्या वीर नारींना राज्य शासनामार्फत
राज्य परिवहन बस मध्ये 2500 कि.मी. प्रवास करण्याकरीता 3586 रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व पोलीस अधिक्षक
पंकज देशमुख यांच्या हस्ते उस्मानाबाद जिल्हयातील एकूण नऊ पैकी प्रातिनिधीक तीन
वीर नारींना धनादेश सुपूर्द करण्यात आला. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील खानापूर येथील श्रीमती
प्रभावती राजाराम निकम, लोहारा तालुक्यातील
नारंगवाडी येथील श्रीमती बेबीताई शहाजी व तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील
श्रीमती कांताबाई विश्वनाथ कदम यांचा समावेश आहे. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.