Sunday, 9 April 2017

बळीराजा चेतना अभियान समर्थपणे राबवून बळीराजाला धीर द्या -पालकमंत्री दिवाकर रावते




        उस्मानाबाद,दि.9:- बळीराजा चेतना अभियानांतर्गत असलेल्या ग्राम समितीला कार्यान्व‍ित करून त्यांच्याकडून गावचा आराखडा तयार करा व बळीराजा चेतना अभियान समर्थपणे राबवा, अशा सुचना राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा जिल्हयाचे  पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली बळीराजा चेतना अभियान आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार सुजितसिंह ठाकूर,जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक,  मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी सचिन बावसकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, जिल्हा माहिती अधिकरी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी,जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, समाज कल्याण अधिकारी मिनगिरे,  पशुसंवर्धन अधिकारी शितलकुमार मुकणे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक सुभाष चोले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री श्री.रावते म्हणाले की, ग्राम समितीच्या ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेवून समितीच्या कामाचा आढावा घ्या,  कर्जबाजारी शेतकऱ्यांचा तपशिल तयार करून त्याची वर्गवारी तयार करा, नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी सर्वच विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची सूचना यावेळी त्यांनी केली.

बळीराजा चेतना अभियानाद्वारे कृषी विभागात शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवड करावी, असे ही पालकमंत्री श्री. रायते यांनी यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी यांना केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी बैठकीत बळीराजा चेतना अभियानांर्तगत जिल्हयात राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती बैठकीत विषद केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी बळीराजा चेतना अभियानतून आरोग्य विभागाने केलेल्या कामाची माहिती यावेळी सांगितली.