Monday, 10 April 2017

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे रहावे-पालकमंत्री दिवाकर रावते




            
उस्मानाबाद.दि.10:-प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे, अशा सूचना परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केल्या.
          मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा नियोजन सभागृहात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पालकमंत्री श्री.रावते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,प्रभारी जिल्हाधिकारी अविनाश पाठक,जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी शिरिष जमदाडे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, प्रकल्प उपसंचालक सुभाष चोले, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी श्री.खोत, तहसिलदार सुजित नरहरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री श्री.रावते म्हणाले की, येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे कमतरता भासणार नाही यासाठी काळजी घ्यावी तसेच खरीप पूर्व हंगाम शेती मशागतीसाठी गावोगावी शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर मेळावे घेवून शेतकऱ्यांना दिलासा दयावा.
          शेतकऱ्यांना सावकारी कायदयाबाबत माहिती व्हावी यासाठी गावात दवंडी देवून जास्तीत जास्त  जनजागृती करावी, शेतकऱ्यांना खरीप पिक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्ररित्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, जेणे करून शेतकऱ्यांना सुलभतेने पिक कर्ज उपलब्ध होईल. असे ही श्री.रावते  म्हणाले.

           या आढावा बैठकीत जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी श्री.जमदाडे यांनी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे प्रस्ताविक केले तर आभार जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री.खोत यांनी मानले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.