Friday, 7 April 2017

मुलींनो आपल्या हक्काबाबत जागरूक व्हा ! - जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे




        उस्मानाबाद,दि.7:-जिल्हयात मुलींचा जन्मदर वाढविण्यामध्ये  आपल्या जिल्हयाला यश मिळाले आहे, परंतु आता मुलींनो येथेच थांबून चालणार नाही,मुलींनो आपल्या हक्काबाबत जागरूक व्हा ! असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत  नारनवरे  यांनी  आज  येथे केले.
उमेद स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे 10  वी  12  वीच्या  मुलींकरिता स्पर्धा परिक्षा व्यवसाय मार्गदर्शन शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद हे उपस्थित होते.
        डॉ.नारनवरे आपल्या मागदर्शनपर भाषणात  म्हणाले की, आपल्या बाळाचे  पालकत्व  स्वीकारणे  सोपे असते  मात्र  समाजाचे  पालकत्व स्वीकारणे ही बाब खूप मोठी आहे. समाजाचे  पालकत्व स्त्री-पुरूष  दोघांनीही स्वीकारल्यास  समाजाचा  विकास  झपाट्याने  होतो.
        उस्मानाबाद जिल्हयात मुलींचा जन्मदर वाढविण्यात प्रशासनाला यश मिळाले,स्त्रीभ्रूण  हत्या  या  विषयावर  प्रशासनाने अंत्यंत  गांभीर्यांने कृतीपूर्ण निर्णय घेतले, ज्या समाजात महिलांचे प्रमाण कमी होते त्या समाजाची देशाची सामाजिक परिस्थिती धोक्यात येते, याकरिता सर्वांनी मिळून काम करायला हवे.आधी मुलींनी स्वत:ला मदत करायला शिकले  पाहिजे. तरच बाहेरचे तुम्हाला मदत करतील, संकटांना न घाबरता धैर्याने आयुष्याची वाटचाल करा,असे  सांगून  ते  पुढे म्हणाले की, माणूस म्हणून जगायला अधिकार कष्ट करून  मिळावा,आणि या उमेद स्पर्धा मार्गदर्शन केंद्रामुळे ही क्षमता तुमच्यामध्ये निर्माण  होत  आहे  त्याचा  मला  निश्चित  अभिमान आहे.
        यावेळी डॉ.नारनवरे यांनी  या मुलींना स्पर्धा परिक्षेचे ध्येय कसे निश्चित करावे, ध्येय निश्चितीनंतर अभ्यास कसा करावा आणि यशस्वी झाल्यानंतरही पुढील वाटचाल कशी करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.याबरोबरच त्यांनी विशाखा समिती तसेच मनोधैर्य योजना  याविषयीही उपस्थितांना माहिती दिली.
        यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित मुलींना आपण ग्रामीण भागातील असल्याचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने अथक प्रयत्नांनी यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच उमेदने ग्रामीण भागातील मुलींना स्वाभिमानाने उभे राहायला प्रेरीत केले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यंचे अभिनंदन केले व या मुलींनी पुढच्या पीढीसाठी सावित्रीबाई फुले व्हावे असे आवाहनही केले.
        शेवटी आभार प्रदर्शन व्यक्त करताना मुख्य कार्यकारी  अधिकारी श्री. रायते यांनी उमेदची स्थापना कशी झाली,उमेदचे कार्य कसे चालते आणि भविष्यात उमेद जास्तीत जास्त मुलींसाठी उमेद निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षणाधिकारी (निरंतर) श्री. कादर शेख यांनी केले. यावेळी पल्लवी शिंदे,भग्यश्री लोंढे या विदयार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.

        या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, शिक्षणाधिकारी (मा) औदुंबर उकिरडे, शिक्षणाधिकारी (प्रा)सचिन जगताप, शिक्षणाधिकारी (निरंतर)संजयकुमार राठोड, वरिष्ठ लेखाधिकारी रविद्र शिंदे, उपशिक्षणाधिकारी (निरंतर) कादर शेख, स्वीय सहाय्यक अनिल केसकर,मिलींद प्रयाग, विस्तार अधिकारी सोमनाथ घोलप,ग्रं थपाल श्रीमती आशा नवले,श्रीमती बिडवे, श्रीमती तब्बसम सय्यद, श्रीमती सोनवणे आणि 10 वी,12 वी, पदवी परिक्षेस  बसलेल्या  मुली  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.