Saturday, 25 July 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणिकरण अनिवार्य ; शेतकऱ्यांनी दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करावी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६
कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणिकरण अनिवार्य ; शेतकऱ्यांनी दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करावी
धाराशिव,दि.२५ जुलै (जिमाका) राज्य शासनाने २४ जुलै २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत जिल्ह्यातील ४६ हजार ४६ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.या सर्व पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असून,आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे यादीतील सर्व शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवसांत आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, धाराशिव यांनी केले आहे.यासाठी सर्वप्रथम ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय,चावडी कार्यालय तसेच संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील विशिष्ट क्रमांक,स्वतःचे आधार कार्ड आणि ॲग्रीस्टॅक क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जावे.तेथे संबंधित केंद्र चालकास विशिष्ट क्रमांक,आधार क्रमांक व ॲग्रीस्टॅक क्रमांक देणे आवश्यक आहे.ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी ॲग्रीस्टॅक क्रमांक घेतलेला नसेल, त्यांनी तो तत्काळ केंद्र चालकाकडून काढून घ्यावा.
शेतकऱ्यांकडून आवश्यक माहिती प्राप्त झाल्यानंतर केंद्र चालक पोर्टलवरील कर्जाची माहिती आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करेल.सर्व माहिती अचूक असल्यास आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांचे प्रकरण पोर्टलवरून कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा करण्यासाठी पुढील कार्यवाहीसाठी पाठविले जाईल.
मात्र कर्जाची माहिती,कर्ज खाते किंवा आधार क्रमांक यामध्ये तफावत आढळल्यास त्याबाबतची तक्रार पोर्टलवरच नोंदविण्यात येईल.त्यानंतर तक्रारीचे स्वरूप लक्षात घेऊन ती तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे किंवा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे पोर्टलमार्फत पाठविण्यात येईल.याची पावती संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
तक्रार निवारण समित्यांकडून तक्रारीचा निपटारा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची फाईल कर्जमाफीचा लाभ मंजूर करण्यासाठी पोर्टलमार्फत शासनाकडे वर्ग करण्यात येईल.
दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती दर्शविणारे स्टँडी (Standee) प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रावर प्रदर्शित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, कीर्ती किरण पुजार यांनी सर्व केंद्रचालकांना दिल्या आहेत.
यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,धाराशिव यांनी केले आहे.
*******