Wednesday, 22 July 2026
तेलबिया मूल्यसाखळी भागीदारीसाठी ३० जुलैपर्यंत अर्ज करा राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना आवाहन
तेलबिया मूल्यसाखळी भागीदारीसाठी ३० जुलैपर्यंत अर्ज करा
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना आवाहन
धाराशिव,दि.२२ जुलै (जिमाका) राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया (NMEO-OS) सन २०२६-२७ अंतर्गत सोयाबीन, भुईमूग, करडई आणि सूर्यफूल या पिकांसाठी धाराशिव जिल्ह्यात मूल्य साखळी भागीदार (Value Chain Partner-VCP) निवडण्यात येणार आहे.या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी पिकनिहाय मूल्य साखळी भागीदार म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांची (FPC) निवड करण्यात येणार असून,पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ३० जुलै २०२६ पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत जिल्हा तेलबिया समितीमार्फत निवड झालेल्या मूल्य साखळी भागीदारांद्वारे शेतकरी प्रशिक्षण, प्रमाणित बियाण्यांचे वितरण, शेतकरी शेती शाळांचे आयोजन, मूल्य साखळी गटातील शेतकऱ्यांच्या माती परीक्षणाची सुविधा,कृषी मॅपरवर लाभार्थ्यांची माहिती नोंदविणे आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांसाठी पात्रता निकष
मूल्य साखळी भागीदार म्हणून निवड होण्यासाठी संबंधित संस्था कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
संबंधित तालुक्यात किमान तीन वर्षांचा कामाचा अनुभव असावा, म्हणजेच संस्थेची नोंदणी मार्च २०२३ पूर्वीची असावी.शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्थेमध्ये किमान २०० सदस्य नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. सहकारी संस्थांच्या उद्दिष्टांमध्ये तेलबिया पिकांशी संबंधित कामकाजाचा स्पष्ट उल्लेख असावा.
तसेच मागील तीन वर्षांची सरासरी वार्षिक उलाढाल किमान नऊ लाख रुपयांपेक्षा अधिक असावी. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचा किमान तीन लाख रुपयांचा समभाग असणे आवश्यक आहे.कमी उत्पादकता असलेल्या तालुक्यांमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.शासनाकडून अनुदान प्राप्त शेतकरी उत्पादक कंपन्या, तसेच '१०,००० शेतकरी उत्पादक संघ (FPO)' योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्या आणि NAFED, NSC-OS आदी सार्वजनिक संस्थांकडे नोंदणीकृत तेलबिया क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे.
सार्वजनिक व खासगी संस्थांसाठीही संधी
बियाणे,खाद्यतेल व खत क्षेत्रात कार्यरत केंद्र अथवा राज्य शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसह The Solvent Extractors Association of India (SEA), The Soybean Processors Association of India (SOPA), Mustard Producers Association of India (MOPA), Indian Vegetable Oil Producers Association (IVPA), National Seed Association of India (NSAI) आणि Federation of Seed Industry of India (FSII) या संस्थांचाही मूल्य साखळी भागीदार म्हणून विचार केला जाणार आहे.
या संस्थांची निवड गुणांकन पद्धतीच्या आधारे केली जाणार असून,त्यासाठी किमान १० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल,मागील तीन वर्षांत कोणतीही करथकबाकी नसणे आणि बियाणे,खते व खाद्यतेल क्षेत्रात किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
तेलबिया उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचा उपक्रम
राज्यात तेलबिया उत्पादनास चालना देऊन खाद्यतेल उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया राबविण्यात येत आहे.या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांना मूल्य साखळी भागीदार म्हणून संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, तेलबिया पिकांचे उत्पादन वाढविण्यासह शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या,सहकारी संस्था तसेच पात्र सार्वजनिक व खासगी संस्थांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ३० जुलै २०२६ पर्यंत आपले परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
*****