उस्मानाबाद, दि. 9 :- समाज हा जेष्ठांच्या मार्गदर्शनानेच घडतो आणि
यापुढेही घडत राहील, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी आज येथे
केले. सामाजिक न्यायविभागामार्फत आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरीक दिनानिमित्त सामाजिक
न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री. रविंद्र शिराळ,
सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनिता मते, समाजकल्याण अधिकारी अमित घवले, धाराशिव जेष्ठ
नागरिक संघटनेचे अध्यक्ष ॲङ देशमुख हे उपस्थित होते.
श्री. गिरासे पुढे म्हणाले की, जेष्ठांचे प्रश्न किंवा
समस्या या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीनुसार बदलत असतात. सर्वांचेच प्रश्न सारखेच
असतील असे नाही मात्र आजच्या काळात समाजाने आणि शासनाने मिळून जेष्ठ नागरिकांसाठी
गांभीर्याने प्रयत्न करणे, ही सामाजिक गरज बनली आहे. यासाठी सर्वच घटकांनी
एकमेकांसाठी दुवा म्हणून काम केल्यास दोन पिढयांमधील अंतर निश्चितच कमी होईल.
पर्यायाने जेष्ठांच्याही समस्या सुटण्यास सकारात्मक परिस्थिती तयार होईल.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना श्री. शिराळ यांनी जेष्ठांची
व्याख्या करताना सांगितले, जेष्ठ म्हणजे वयाची साठी पूर्ण केलेली आणि अनुभवाची
भरमसाठ शिदोरी असलेली व्यक्ती. “जेष्ठ नागरिकांच्या समस्या व
त्यावरील उपाय” या विषयावर बोलताना ते
म्हणाले की, जेष्ठांना तीन प्रकारच्या समस्या असतात शारिरीक, मानसिक, आर्थिक आणि
यावर मात करायची असेल तर आध्यात्म हा त्यावरील रामबाण उपाय आहे. जेष्ठ नागरिकांनी आध्यात्माची
कास धरुन अंतर्मुख व्हावे, आपली वर्तणूक जपावी, मीपणा सोडून कुठलीही अपेक्षा न
ठेवता समाजाला, कुटुंबाला जे-जे देता येईल ते-ते द्यावे, स्वावलंबी व्हावे असे
सांगून त्यांनी जेष्ठ नागरिकांसाठी ज्या संस्था काम करतात त्यांचे आभार मानले आणि
मागची पिढी व आत्ताची पिढी यात सुसंवादाची गरज असल्याचे मत शेवटी व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ नागरिकांच्या मराठवाडा
विभागीय बॅडमिंटन स्पर्धेतील विजेते डॉ. राऊत, ॲङ राम गरड, संजय नायगावकर, डॉ.
पाईकराव यांचा प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर
अनु. जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील कु. नकुशा बनसोडे, पायल शितोळे,
भाग्यश्री राठोड, नेहा देडे, यांचा 100 मीटर रिले विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक
आल्याबद्दल व त्यांची निवड राज्यस्तरावर झाल्याबद्दल प्रशस्तीपत्र देवून गौरव
करण्यात आला. यानंतर श्रध्दा वाघमारे हिला जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत प्रथम
क्रमांकाबद्दल गौरविण्यात आले.
याचबरोबर आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनाच्या
निमित्ताने विष्णुपंत कुलकर्णी, श्रीमती सीताबाई साळुंके, खंडू कांबळे, पांडुरंग
पडवळ, परसू लमान (आडे), राजाराम पडवळ, उमाकांत नायगावकर, भास्कर नायगावकर, कमलाकर
आयाचित, रामकृष्ण कुलकर्णी, आर.जी. कुलकर्णी, व्यंकटेश डांगे, सिद्राम भोसले,
दलितमित्र शंकर खुणे, श्री. व सौ. विद्यालंकार या सर्व जेष्ठांचा शाल, श्रीफळ व
प्रशस्तीपत्र देवून यथोचित आदर सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप धाराशिव जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष
ॲङ देशमुख यांनी केले. यावेळी त्यांनी असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शासनाचे
आभार व्यक्त केले. शेवटी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे समाजकल्याण अधिकारी अमित
घवले यांनी आभार मानले.