उस्मानाबाद, दि.13:-
राज्यातील काही भागात पिकावर फवारणी करतांना झालेल्या विषबाधेच्या दुर्घटनेच्या अनुषंगाने
जिल्ह्यात अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये याकरीता किटकनाशके हाताळताना व फवारणी
करताना शेतकऱ्यांनी सर्वोतोपरी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे
यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात
कीटकनाशकाचा सुरक्षित वापर प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. गमे बोलत
होते. यावेळी कृषी सभापती श्रीमती. अविदा जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी
सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी श्री.चिमणशेटे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी महाविद्यालयाचे प्रा.विजय भामरे
आदीसह विविध किटकनाशक कंपनीचे प्रतिनिधी
उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पुढे
म्हणाले की, औषधाची फवारणी करताना काय करावे काय करु नये याची जनजागृती व्हावी
म्हणून शासन प्रयत्नशील आहे. विषबाधा झल्याबरोबर काय प्रथमोपचार करावेत याची
माहिती असणे आवश्यक आहे.औषधाचा उपयोग कसा करावा याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देणे
व घेणे महत्त्वाचे आहे.अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न
करणे आवश्यक आहे, शेतकऱ्यांनी योग्य माहिती घेऊनच औषध फवारणी करावी.
औषधाच्या बॉक्समध्ये जे
माहिती पत्रक असते ते वाचता येण्याजोगे असावे, असे औषध विक्रेत्यांनी औषध
कंपन्यांना कळवायला हवे. औषधाची फवारणी करताना काही सुरक्षित मार्ग पर्यायाचा
अवलंब शेतकऱ्यांनी करावा. स्वत:च्या फायदयासाठी दुसऱ्याचा बळी घेणे वा विचारही न
करणे ही संस्कृती वाढीस लागत आहे, हे चिंताजनक आहे.यावर विचार करुन समाजाच्या
चांगल्याचा विचार करावा, असेही यावेळी जिल्हाधिकारी श्री.गमे म्हणाले.
यावेळी “किटकनाशकांची सुरक्षित हाताळणी” या विषयावर प्रा. भामरे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.