Friday, 8 September 2017

आपत्ती जोखिम व्यवस्थापनासह विकास कार्यक्रमाची कार्यशाळा संपन्न




आपत्ती जोखिम व्यवस्थापनासह विकास कार्यक्रमाची कार्यशाळा संपन्न 
उस्मानाबाद, दि. 7 :- विविध विभागाच्या विकासाच्या कामामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे मुद्दे सामिल करुन लोकांचे किंवा समुदायाचे संभाव्य आपत्ती व्य्वस्थापनाच्या वेळी नुकसान टाळता यावे, यासाठी आपत्ती जोखीम व्यवस्थापनासह विकास कार्यक्रम या प्रकल्पसंदर्भात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची जिल्हास्तरीय कार्यशाळा आज संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्‌दघाटन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले.
 यावेळी, माजी उपाध्यक्ष आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरण (बिहार राज्य) श्री. अनिल सिंह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन तज्ञ श्री. सरबजित सिंग सहोटा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, रेडआर इंडियाचे  कार्यकारी संचालक  श्री.तानाजी शेन तसेच मंदार वैद्य, प्रविण पवार, चंद्रकांत देवकर, शाबाज खान, तनुजा आदींसह जिल्ह्यातील विविध विभागाचे  प्रमुख यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शासन, युनिसेफ व रेडआर इंडिया यांचा जिल्ह्यात संयुक्त पथदर्शी कार्यक्रम आहे.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.गमे म्हणाले की, जिल्ह्यास विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो कधी भुकंपानंतर जिल्ह्यात दुष्काळ, तीव्र पाणी टंचाई, अतिवृष्टी, पूर, वीज अशा अनेक आणि त्यामधुन उद्‌भवनाऱ्या धोक्यांना सामोरे जावे लागते अशा समस्यांमुळे विकासकामांना मोठया प्रमाणावर बाधा येते. त्यामुळे विविध विभागाच्या विकास आराखडयामध्ये आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा तपशीलवार समावेश करण्यात येणार आहे. यासाठी पथदर्शी जिल्हा म्हणून आपला जिल्हा निवडला आहे ही एक चांगली संधी आहे,  याचा चांगला उपयोग करुन घेण्यासाठी प्रत्येक विभागाने आपत्ती जोखिम व्यवस्थापनासह विकास आराखडयाचे आपल्या विभागात काय नियोजन करता येते ते पाहावे, असे ही सांगितले.
सरबजित सिंह यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपत्ती जोखिम व्यवस्थापनाचे काम करताना संभाव्य आपत्तीचे धोके कमी करण्यासाठी जिल्हा, विभाग व गावपातळीवर शासकीय समन्वय यंत्रणा समृध्द झाली पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये  मदतीबरोबर अन्य कामे ही केली पाहीजेत.
यावेळी अनिल सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याचे महत्व सांगितले. तसेच प्रत्येकाची सुरक्षा जशी महत्वाची आहे तसेच संभाव्य आपत्तीच्या वेळी प्रत्येक विभागाची ही सुरक्षा झाली पाहीजे, संभाव्य परिस्थितीला हाताळण्यासाठी पूरपरिस्थीतीमुळे साथ रोगांना नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा, विद्युत पुरवठा सुरळित ठेवण्यासाठी महावितरण कंपनी, दुरध्वनी सेवा सुस्थितीत ठेवण्यासाठी दुरसंचार विभाग, रस्त्यांने वाहतूकीचा संपर्क असावा यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ, पाटबंधारे विभाग व इतर संबंधित विभागांनी ही सज्ज असले पाहिजे यासाठी सर्व विविध प्रमुखांनी आपल्या विभागाचा पुढाकार घेवून योगदान दयावे यासाठी ही कार्यशाळा आवश्यक आहे.
या कार्यक्रमाची थोडक्यात श्रीमती. तेलोरे यांनी रुपरेषा यावेळी विषद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदार वैद्य यांनी केले, तर आभार चंद्रकांत देवकर यांनी व्यक्त केले