Tuesday, 5 September 2017

"अवयवदान" विषयावरील जनजागृती विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा


उस्मानाबाद.दि.5:- विद्यार्थ्यांनी अवयवदानाबाबत समाजात जनजागृती करुन त्याबाबत असणारे  गैरसमज दूर करुन  अवयदान करण्याबाबत प्रभावी मोहीम राबवावी, असे प्रतिपादन जिल्हा अवयवदान मोहीम समन्वयक डॉ.गजानन परळीकर यांनी केले.
            जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने "दिशा करिअर ॲकॅडमी" येथे आयोजित ‘संवाद पर्व’ कार्यक्रमात डॉ. परळीकर बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, दिशा करिअर ॲकडमीचे संचालक प्राध्यापक श्री. बाळकृष्ण उंबरे, प्रा. सिध्देश्वर मते आदी मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी बोलताना डॉ. परळीकर म्हणाले की, जनजागृतीच्या अभावी अवयवदान करणाऱ्यांची संख्या आज समाजात खूप कमी आहे, त्यामुळे अनेक गरजवंत उपेक्षित आहेत.त्यासाठी युवा शक्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजात अवयवदानाच्या बाबतीत जनजागृती करुन अवदानाची चळवळ बनवली पाहीजे. उपस्थित विद्यार्थ्यांना अवयवदान करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
             जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यावेळी बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच सखोल ज्ञान मिळावे म्हणून ‘संवाद पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन करिअर ॲकडमीत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य हे मासिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असून या मासिकामध्ये राज्य शासनाने घेतलेले निर्णय, शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनाची माहिती मिळते, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी  लोकराज्य मासिकाचे वार्षिक  वर्गणीदार होण्याचे आवाहन यावेळी केले.  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अनेक कार्यक्रम, उपक्रम राबविले जातात यामध्ये शासनाच्या  विविध योजना, यशकथा, वेचक वेधक, फस्ट पर्सन, नौकरी मार्गदर्शन, महाभ्रमंती,  दिलखुलास, जय महाराष्ट्र,छायाचित्र दालन, चित्रफीत दालन आदींची "महान्यूज" या ऑनलाईन न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सविस्तर व विश्वासार्ह माहिती दिली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी महान्यूज ही पाहिले पाहिजे असे सांगितले. 
या "संवाद पर्व" कार्यक्रमात श्री.सानप यांनी स्पर्धा परिक्षेतील मुलाखत व व्यक्तिमत्व विकास या विषयावर सविस्तर मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी केले.
नगरपालिका प्रशासनाचे व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी विद्यार्थ्यांना नगरपालिका प्रशासन कशा प्रकारे काम करते, नागरी सुविधा, नगरपालिकेत प्रशासन अधिकारी निवड होते, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, नगरपालिकेत कुठली कुठली प्रशासनाचे पदे असतात या विषयी माहिती दिली.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी  या कार्यक्रमात सक्रिय होवून आपल्या अडचणी व शंका उपस्थित करुन त्याचे मान्यवरांकडून निरसन करुन घेत चर्चात्मक संवाद साधला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्ञानेश्वर बंडगर  यांनी केले तर आभार संदीप गायकवाड  यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.