Monday, 4 September 2017

स्पर्धा परिक्षेसाठी इतिहासाचा अभ्यास करताना संदर्भग्रंथांचेही वाचन करा पुरातत्व अभ्यासक जयराज खोचरे


उस्मानाबाद, दि.03:- स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना इतिहास या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत-जास्त संदर्भग्रंथांचेही वाचन करावे, असे प्रतिपादन पुरातत्व अभ्यासक जयराज खोचरे  यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद यांच्या वतीने मौजे ढोकी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था, उदगीर, जिल्हा लातूर आणि जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद पर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, ढोकी येथील सामाजिक कार्यकर्ते सतिश बप्पा देशमुख, राहुल पाटील, राहुल जगताप व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.   
जयराज खोचरे यांनी सांगितले की, इतिहास या विषयाचा अभ्यास एखाद्या चांगल्या संदर्भ ग्रंथातून, क्रमिक पुस्तकातूनच सुरुवात करा, जेणेकरुन सर्व प्रश्न प्रकारांनुसार तुम्ही विचार कराल आणि कमी वेळेत त्या संबंधीत विषयात पारंगत व्हाल. स्पर्धा परीक्षेचा फक्त अभ्यास करु नका तर तो आपल्या जगण्याचा एक भाग बनवा. जास्त संदर्भग्रंथ वाचण्यापेक्षा प्रत्येक घटकावर एक किंवा दोन संदर्भग्रंथांचे वाचन करा, सध्याच्या परीक्षेचे स्वरुप गतिशील झाले आहे त्यामुळे केवळ माहितीचा साठा उपयोगी नाही, वाचन किंवा अभ्यास विश्लेषणात्मक आणि सुसंगत असणे गरजेचे आहे, प्रत्येक गोष्टीत अभ्यास शोधा तरच तुमच्यामध्ये भावी अधिकारी होण्याचे गुण तयार होतील.
तसेच शासन विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल असे अनेक उपक्रम राबवित आहे, याचाच एक भाग म्हणून संवादपर्व हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.   
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी ‘संवाद पर्व’ कार्यक्रम आयोजनाचा उद्देश उपस्थिताना समजावून सांगितला. शासनाच्या विविध योजनांची माहिती कोणकोणत्या संकेतस्थळावर मिळू शकते तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र या उपक्रमांची माहिती दिली. तसेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असताना अनेक शंकाकुशंकानी मन वेढलेलं असतं, त्यामुळे सर्वप्रथम या शंकाकुशंका, संशयकल्लोळ मनातून बाजूला करा, ज्या पदासाठी आपण तयारी करतोय त्याचा अभ्यासक्रम काय आहे, बरेच विद्यार्थी परिक्षा पास होवून देखील मुलाखतीत पात्र ठरीत नाहीत, त्यामुळे मुलाखतीची तयारी आपण कशा पध्दतीने केली पाहिजे, मुळात आयुष्य हे
सरल, सुगम कधीही नसतं. अनंत अडचणी, अडथळे, विवंचना यातून मार्ग शोधावा लागतो. त्या
आयुष्याच्या अडथळ्यांच्या तुलनेत हे अडथळे अगदी किरकोळ आहेत. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा, आज ना उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.  

यावेळी ढोकी गावचे सामाजिक कार्यकर्ते, संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.