Tuesday, 5 September 2017

शौचालय बांधा व त्याचा नियमित वापर करा -महारुद्र गालट


उस्मानाबाद,दि.5 :- स्वच्छता अभियानात नागरिकांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवून, प्रत्येकाने शौचालय बांधून त्याचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन नगरपरिषदेचे व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी केले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शहरातील शिवाजीनगर, नगरपालिका शाळा क्र. 6 च्या परिसरातील शिवप्रताप तरुण गणेश मंडळ आयोजित संवाद पर्व कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून महारुद्र गालट बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे डॉ. गजानन परळीकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांची उपस्थिती होती. 
महारुद्र गालट यांनी शौचालय बांधकामासाठी नगर परिषदेकडून मिळणारे अनुदान, बचत गट संकल्पना,  प्रधानमंत्री आवास योजना, स्वयंरोजगार उपांगाअंतर्गत विविध उद्योगांची निवड, कर्ज प्रकरण, बँक व्यवहार इत्यादी बाबत उपस्थित गणेश भक्तांना सविस्तर मार्गदर्शन केले.
            मृत्यूनंतर शरीराची पारंपरिक विधीनुसार विल्हेवाट लावली जाते. परंतु मृत्यूनंतरही आपण इतरांच्या कामी येऊ शकतो ते केवळ अवयवदानाच्या माध्यमातूनच. अवयवदानातून शरीराचे विविध महत्त्वपूर्ण भाग आणि कातडी गरजूंना मिळण्यास मदत होते. अवयवदान करतानाही शासन मोठ्या प्रमाणात काळजी घेऊन कडक नियमावलीचे पालन करते. रुग्ण व नातेवाईकांच्या संमतीनेच अवयव काढून गरजू रूग्णांना वेळेत अवयवाचे प्रत्यारोपन केले जाते. त्यासाठी डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन अवघड असे हे कार्य शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडावे लागते.
            अवयवदात्याचे अवयव काढल्यानंतर अतिशय आदरपूर्वक संबंधित शरीर त्यांच्या  नातेवाईकाकडे सुपूर्द करण्यात येते, अशी माहिती  डॉ. गजानन परळीकर यांनी यावेळी दिली. तसेच अवयवदानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. संकल्प करावा, असेही डॉ. परळीकर म्हणाले. ज्येष्ठ, तरुण आणि चिमुकल्यांच्या शंकांचे निरसनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी गणेशोत्सव काळातील संवाद पर्व या उपक्रमाच्या माध्यमातून शासनामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची, उपक्रमांची जनतेला माहिती व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून शासनाच्या विविध योजनांची माहिती कोणकोणत्या संकेतस्थळावर मिळू शकते तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र या उपक्रमांची माहिती दिली. 
प्रारंभी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन गणेश मंडळाचे अनिकेत पवार यांनी केले तर आभार श्री. विकी ढेकणे यांनी मानले. कार्यक्रमास गणेश मंडळाचे बाळासाहेब चव्हाण, भाऊसाहेब कथले यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूण-तरूणी, बालवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.