Monday, 4 September 2017

बहुरुपी कलावंतांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी कार्य करणार समाजकल्याण अधिकारी श्री. मिनगीरे


उस्मानाबाद, दि.04:- बहुरुपी कलाकारांनी संपूर्ण आयुष्यभर विविध कलांद्वारे समाजाला आनंद दिला आहे, शासनाच्या वतीने समाजकल्याण विभागांतर्गत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल अशा प्रकारचे कार्य पुढील काळात करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचचे समाज कल्याण अधिकारी श्री. मिनगीरे यांनी दिली.  
            जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील हंगरगा वस्ती येथे संवाद पर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    
यावेळी उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, पंचायत समिती सदस्य शिवाजी गोरे, उपसरपंच मधुकर भंडारे, नागनाथ लोंढे, राजाभाऊ घोडके, डॉ. किरण पवार, डॉ. कुतवाळे यांच्यासह नागरीकांची उपस्थिती होती.    
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, सांस्कृतिक, कला, वाड्मय क्षेत्रात  बहुरुपी कलाकारांची महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. ज्या स्त्री किंवा पुरुष कलावंताचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांना शासनाच्या वतीने विशेष सहाय्य केले जाते. या ठिकाणच्या जास्तीत-जास्त कलावंतांना मानधन देण्यासाठी मी प्रयत्न करीन तसेच शासनाच्या वतीने असणाऱ्या योजनांचा लाभ देण्याचाही प्रयत्न करीन. तसेच संवादपर्व हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.   
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी ‘संवाद पर्व’ कार्यक्रम आयोजनाचा उद्देश उपस्थिताना समजावून सांगितला. शासनाच्या विविध योजनांची माहिती कोणकोणत्या संकेतस्थळावर मिळू शकते तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुलास, जय महाराष्ट्र या उपक्रमांची माहिती दिली.
उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यावेळी बोलताना म्हणाल्या की, कलावंताच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च शासनाच्या वतीने करण्यात येतो त्यासाठी या भागातील सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज एकत्रीतरित्या भरुन सादर करावेत आणि या भागातील एकही लहान मूल शिक्षणापासुन वंचित राहायला नको यासाठी आवश्यक ती मदत करण्यास उत्सुक असल्याचे सांगीतले.
त्यानंतर शाहीर राणा जोगदंड, माऊली विभूते, सिध्दराम विभूते, निलम विभूते यांनी समाजप्रबोधनपर गीत सादर केली तर बहुरुपी कलावंतांनी रामायणाचे सादरीकरण कलेच्या माध्यमातून सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी हंगरगा वस्तीच्या गणेश मंडळाचे पदाधिकारी, बहरुपी कलावंत, महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.