Thursday, 24 August 2017

राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा उदघाटन समारंभ संपन्न

                   

उस्मानाबाद,दि. 24:- राष्ट्रीय  अंधत्व  नियंत्रण कार्यक्रम  अंर्तगत दि. 25 ऑगस्ट  ते 08 सप्टेंबर 2017 या  कालावधीत  32 वा  राष्ट्रीय  नेत्रदान पंधरवाडा  साजरा  करण्यात येत असून जिल्हा रुग्णालयात नेत्रदान पंधरवाडा  समारंभाचे उदघाटन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ.धनंजय पाटील व मोतिबिंदु शस्त्रक्रिया झालेले रुग्ण यांच्या हस्ते दिप प्रज्वलन तसेच डॉ. भालचंद्र व धन्वंतरी  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले.
            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील हे होते.  प्रमुख  पाहुणे  म्हणुन रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्री. अब्दुल लतीफ अब्दुल मजीद हे होते. यावेळी  निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, नेत्रशल्यचिकित्सक डॉ.ज्योति कानडे, डॉ. एम.के.पल्ला डॉ.गजानन परळीकर, डॉ.वृंदाराणी वीर, नेत्रचिकित्सा अधिकारी श्री.घाडगे बी. एम. व श्री शेख ए.एल. सहाय्यक अधिसेविका श्रीमती शेख व सर्व नर्सिंग स्टॉफ व रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी रुग्ण व नातेवाईक  यांची विशेष उपस्थिती होती.
 यावेळी बोलताना डॉ.ज्योति कानडे यांनी नेत्रदान म्हणजे काय नेत्रदानाची आवश्यकता, समाजातील अंधत्वाच्या समस्येवर नेत्रदान केल्यावर नियंत्रण मिळविता येऊ शकते. तसेच भारतात दरवर्षी लाखोंच्या संख्येत मृत्यू होतात, त्यातुलनेने होणारे मृत्यु पाहता मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याचे सांगुन सर्वांनी सकारात्मक दृष्टीने नेत्रदानाकडे पाहणे आवश्यक आहे, असे सांगितले व कार्यक्रमासाठी जमलेल्या नागरिक तसेच जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी या सर्वानी नेत्रदान संमतीपत्रे भरुन देण्याबाबत आवाहान ही त्यांनी यावेळी केले.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांनी कार्यक्रमासाठी जमलेल्या नागरिकांना व कर्मचाऱ्यांना नेत्रदान व अवयवदान करुन मरणासन्न व्यक्तीच्या आयुष्याला नवीन आकार देऊ शकतो असे सांगून नेत्रदान व अवयवदानाबाबतचे  महत्व समजावून सांगितले.
            यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य श्री अब्दुल लतीफ अब्दुल मजीद यांनी नेत्रदान हे सामाजिक कार्य असून आपल्या नेत्रदानातून इतरांना दृष्टी देण्याच्या कामी सर्वानी स्वतःहुन पुढाकार घेणे आवश्यक आहे.  समाजात असणारे अंधत्वाचे प्रमाण कमी करण्यात सर्वांचा सहभाग हा मोलाचा आहे, त्यामुळे नेत्रदान एक चळवळ म्हणून समाजात रुजली पाहिजे, असे  मत व्यक्त केले.                                    

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्री.शेख ए.एल. यांनी केले व उपस्थित सर्वांचे आभार मानले.