Friday, 2 December 2016

शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेती करुन स्वत:चा विकास साधावा -जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे



उस्मानाबाद,दि.2:-  उस्मानाबाद हा  जिल्हा अवर्षणग्रस्त  जिल्हा म्हणून  ओळखला जातो, यावर मात करण्यासाठी  येथील  शेतकऱ्यांनी यांत्रिकी शेतीचा  अवलंब करुन स्वत:चा , जिल्ह्याचा  विकास साधावा असे आवाहन  जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी आज येथे केले.
शेतीमध्ये  मजुरीवर  होणाऱ्या  खर्चात  बचत  करणे  व  मशागतीची कामे वेळेवर,जलदगतीने करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण  उपअभियान  ही योजना सन 2016-17 मध्ये उस्मानाबाद जिल्हयात राबविण्यात  येत  आहे. त्या अनुषंगाने  आज 2 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, येथे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे  यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हास्तरीय कार्यकारी  समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते .
या  बैठकीस जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम जमदाडे, कृषी विकास अधिकारी के.बी खोत, विभागीय  व्यवस्थापक  महाराष्ट्र  राज्य कृषि विकास महामंडळ श्री.एम.के पळसापुरे,  प्रकल्प उपसंचालक (आत्मा) व्ही.एम  हिरेमठ,  प्रकल्प समन्वयक सचिन सूर्यवंशी, कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूरचे डॉ.एम.एस फुलारी,कृषी महाविद्यालय, उस्मानाबाद  व  सर्व  तालुका कृषी  अधिकारी  जिल्हयातील  विविध  तालुक्यातील  शेतकरी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीला  जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी यांनी कृषी यांत्रिकीकरण  योजनेची  पार्श्वभूमी व  योजनेचा  उद्देश  याबाबत  सविस्तर मार्गदर्शन  केले.
या बैठकीमध्ये  जिल्हयातून  ट्रॅक्टर  या  घटकासाठी ज्या  शेतकऱ्यांनी  अर्ज  सादर केले होते. त्यांच्या उपस्थितीत व विविध शेतकऱ्यांच्या  हस्ते लॉटरी  पद्धतीने तालुकानिहाय, प्रवर्गनिहाय  लाभार्थ्यांची  निवड  करण्यात  आली.
सर्वप्रथम  उस्मानाबाद  तालुक्यातील  सर्वसाधारण  प्रवर्गातील  प्राप्त अर्जामधून श्रीमती  जिजाबाई  बापू जाधव रा. चिलवडी व श्री. राजेंद्र  किसनराव  देशमुख  पाटील रा. वरवंटी  यांची  निवड  लॉटरी  पद्धतीने  जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या  हस्ते करण्यात आले. जिल्हयात  ट्रॅक्टर  या  बाबीसाठी  सर्वसाधारण  प्रवर्गासाठी  191 अर्ज  प्राप्त   झाले  होते. त्यापैकी  31  लाभार्थ्यांची  लॉटरी पद्धतीने  विविध  तालुक्यातून निवड  करण्यात  आली  व  58 लाभार्थ्यांची  ट्रॅक्टरसाठी  लॉटरी  पद्धतीने  तालुकानिहाय प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी उस्मानाबाद जिल्हयातून  19 अर्ज  प्राप्त  झाले होते.  त्यापैकी 12  लाभार्थ्याची  निवड  लॉटरी पद्धतीने विविध  तालुक्यातून  करण्यात आली व 7  लाभार्थ्यांची लॉटरी  पद्धतीने  तालुकानिहाय प्रतिक्षा यादी  तयार  करण्यात  आली.
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व  इतर  औजारांचा लाभ  कृषी विभागाकडून  या  योजनेत मिळणार  आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी ते कोणत्या शेतकरी  गटात  समाविष्ठ  आहेत  व औजार  घेतल्यानंतर कोणकोणत्या  शेतकरी गटातील शेतकऱ्यांना या औजाराचा  लाभ  देणार आहेत याची  माहिती कृषि  विभागास सादर  करण्याच्या  सूचना दिल्या व  कृषी   विभागाने  अशा प्रकारची माहिती संकलित करावी असे सांगितले.
या  बैठकीचे  आभार  प्रदर्शन  कृषी उपसंचालक श्री.डी.  व्ही जाधवर यांनी केले. बैठक यशस्वी होण्यासाठी तंत्र अधिकारी श्री.बी.आर पवार, श्री.पी.एच धाईजे, कृषी सहाय्यक  यू. आर  लोणीकर यांनी परिश्रम घेतले.