Monday, 6 July 2026

अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास शिष्यवृत्ती नाही ; अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी घ्यावी काळजी

अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास शिष्यवृत्ती नाही ; अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी घ्यावी काळजी धाराशिव दि.६ जुलै (जिमाका) उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना घाईगडबडीत किंवा तात्पुरत्या स्वरूपात एका अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन नंतर तो अर्धवट सोडून दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरील तांत्रिक तरतुदी आणि संबंधित शासन निर्णयातील निकषांमुळे अशा विद्यार्थ्यांचे नव्याने घेतलेल्या अभ्यासक्रमासाठीचे शिष्यवृत्ती अर्ज अपात्र ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना योग्य निर्णय घ्यावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, धाराशिव श्री.सचिन कवले यांनी केले आहे. बारावीनंतर अनेक विद्यार्थी वैद्यकीय,अभियांत्रिकी,फार्मसी, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र,अपेक्षित अभ्यासक्रमात किंवा महाविद्यालयात तत्काळ प्रवेश न मिळाल्यास तसेच शैक्षणिक 'गॅप' टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी तात्पुरत्या स्वरूपात बीए,बीएससी किंवा बीकॉमसारख्या बिगर- व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात.या प्रवेशानंतर ते महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करून त्याचा लाभही घेतात. मात्र,पुढील शैक्षणिक वर्षात अपेक्षित व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळाल्यानंतर ते पूर्वीचा अभ्यासक्रम अर्धवट सोडतात.अशा वेळी महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक तरतुदी आणि शासन निर्णयातील नियमांनुसार त्यांना नव्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही. याबाबतचा नियम स्पष्ट करताना प्रशासनाने नमूद केले आहे की, "महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक तरतुदीनुसार व संबंधित शासन निर्णयातील विहित केलेल्या निकषांनुसार एखाद्या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन त्याकरिताच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन सदर अभ्यासक्रम अर्धवट सोडून कोणत्याही अभ्यासक्रमास नव्याने प्रवेश घेतला तरी देखील अशा विद्यार्थ्यांचा नव्याने घेतलेल्या अभ्यासक्रमाकरिता शिष्यवृत्तीचा अर्ज अपात्र होऊन त्यास कोणत्याही प्रकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान अशा विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे.तसेच या नियमांची माहिती महाविद्यालयाच्या सूचना फलकावर,महाविद्यालयाच्या डिजिटल सोशल मीडिया समूहांमध्ये आणि शिष्यवृत्ती विभागाबाहेर ठळकपणे प्रसिद्ध करावी,अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय शिष्यवृत्तीची रक्कम ही राज्य शासन व केंद्र शासनाकडून डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम शासनाकडे चलनाद्वारे परत करण्याबाबत कोणतेही वित्तीय नियम प्रचलित नाहीत.त्यामुळे शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम शासनास परत करण्याबाबत कोणतेही मार्गदर्शन महाविद्यालय स्तरावरून करू नये, असेही श्री.सचिन कवले यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा अंतिम निर्णय घेताना शिष्यवृत्तीच्या नियमांची सखोल माहिती करून घेणे आवश्यक असून,महाविद्यालयांनीही याबाबत व्यापक जनजागृती करून विद्यार्थ्यांचे संभाव्य शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे. -------------------------------