Tuesday, 26 May 2026

निवडणूक साहित्यावर निर्बंध ; वाहतुकीला अडथळा टाळणार

निवडणूक साहित्यावर निर्बंध ; वाहतुकीला अडथळा टाळणार धाराशिव दि.२५ मे (जिमाका) विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर लावण्यात येणाऱ्या निवडणूक साहित्यावर प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत.वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये तसेच अपघाताची शक्यता टाळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. भारत निवडणूक आयोगाने उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी,या उद्देशाने राजकीय पक्ष,निवडणूक लढविणारे उमेदवार,त्यांचे प्रतिनिधी आणि हितचिंतक यांच्यावर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. आदेशानुसार,सार्वजनिक इमारती, सार्वजनिक रस्ते तसेच अन्य ठिकाणी निवडणुकीसंदर्भातील पोस्टर्स,बॅनर्स,पॅम्प्लेट्स, कटआऊट्स,होर्डिंग्ज,कमानी आदी साहित्य अशा पद्धतीने लावण्यास मनाई करण्यात आली आहे,ज्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होईल किंवा अपघात होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१) (डीबी) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश लागू केले आहेत. संबंधित सर्वांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश जारी करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यानंतर हे आदेश काढण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल किंवा अपघातास कारणीभूत ठरेल अशा प्रकारे निवडणूक साहित्य लावण्यास निर्बंध राहणार आहेत.हे आदेश १९ मे ते २५ जून २०२६ या कालावधीत धाराशिव,लातूर आणि बीड जिल्ह्यात लागू राहतील. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखत नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने ही पावले उचलली आहे. *****