Wednesday, 27 May 2026

जनगणना-२०२७ साठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा १६ मे ते १४ जूनदरम्यान घरसूचीकरण मोहिम ; माहिती गोपनीय राहणार

जनगणना-२०२७ साठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा १६ मे ते १४ जूनदरम्यान घरसूचीकरण मोहिम ; माहिती गोपनीय राहणार धाराशिव दि.२६ मे (जिमाका) भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत देशभरात राबविण्यात येणारी जनगणना-२०२७ ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया असून, त्याअंतर्गत टप्पा क्रमांक ०१ मधील घर सूचीकरण (House Listing) अर्थात घर यादी व घरगणना संदर्भातील माहिती संकलनाचे काम १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत डिजिटल पद्धतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यातही घर सूचीकरण (House Listing) अंतर्गत घर यादी व घरगणना संदर्भातील माहिती संकलनाचे काम प्रभावीपणे सुरू झाले असून,संबंधित चार्ज जनगणना अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरून नियुक्त करण्यात आलेले प्रगणक (Enumerator) व पर्यवेक्षक (Supervisor) नागरिकांच्या घरी भेट देऊन मोबाईल व टॅबच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात माहिती संकलित करत आहेत. जनगणना-२०२७ अंतर्गत विचारण्यात येणाऱ्या ३३ प्रश्नांच्या अनुषंगाने घरांची माहिती,उपलब्ध मूलभूत सुविधा,कुटुंबीयांची माहिती तसेच इतर आवश्यक बाबींची नोंद केली जात आहे. नागरिकांनी घरभेटीदरम्यान संबंधित प्रगणक व पर्यवेक्षक यांची अधिकृत ओळखपत्रे तपासून खात्री करावी आणि जनगणनेसाठी आवश्यक ती अचूक माहिती देऊन प्रशासनाला सकारात्मक सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. जनगणना ही देशाच्या सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक,आरोग्य,पायाभूत सुविधा,रोजगार,गृहनिर्माण,पाणीपुरवठा, वीज,वाहतूक तसेच ग्रामीण व शहरी विकासासारख्या विविध क्षेत्रांतील विकास नियोजनासाठी आधारभूत माहिती पुरविणारी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते.शासनाच्या विविध योजना व धोरणांची आखणी करताना जनगणनेतील माहितीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अचूक व वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून देणे ही राष्ट्रीय जबाबदारी असून,जनगणना कार्यात कोणतीही अडचण निर्माण न करता प्रशासनास सहकार्य करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जनगणना-२०२७ प्रक्रियेदरम्यान संकलित करण्यात येणारी सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून, कोणत्याही नागरिकाची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केली जाणार नाही.त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा, गैरसमज किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये,असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका,विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था,स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी जनगणना-२०२७ हे राष्ट्रीय कार्य यशस्वी करण्यासाठी प्रशासनास सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. “अचूक जनगणना - सक्षम नियोजन - विकसित भारत” या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात जनगणना-२०२७ अंतर्गत टप्पा क्रमांक-०१ मध्ये दि.१६ मे २०२६ ते दि.१४ जून २०२६ या कालावधीत घर सूचीकरण (House Listing) अंतर्गत घरयादी व घरगणना या अनुषंगिक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक (Enumerator) व पर्यवेक्षक (Supervisor) यांना घरभेटीदरम्यान प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने आवश्यक माहिती द्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे. ******