Friday, 16 March 2018

उस्मानाबाद वन विभागाला संत तुकाराम वनग्राम योजनेत चांगले यश


तुळजापूर तालुक्यातील कात्री गावाला पुरस्कार

उस्मानाबाद, दि. 16:-  राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या संत तुकाराम वनग्राम योजनेत उस्मानाबाद वन विभागाने या योजनेच्या स्पर्धेतील दोन पारितोषिके पटकावली आहेत. लातूर जिल्हयातील निलंगा तालुक्यातील लांबोटा या गावाल तर उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर तालुक्यातील कात्री या गावाला पुरस्कार मिळाला आहे.
          विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी अशोक पवार व वन परिमंडळ अधिकारी राहूल शिंदे, वनरक्षक परशुराम राठोड यांच्या टीमसह कात्री ग्रामस्थांनी केलेल्या अथक परिश्रम व पाठपुराव्यामुळे या गावात वनक्षेत्र वाढले असल्याने त्यांना पुरस्कार मिळावा आहे.
          राज्य सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरु केली. वनक्षेत्रात व वनक्षेत्राच्या सीमेवर असलेल्या 15 हजार 600 गावांपैकी 12 हजार 661 गावात वनांचे रक्षण करण्यासाठी वनव्यवस्थापन समित्या स्थापन केल्या. या समित्यांनी वनांचे रक्षण करणे व अवैध वृक्षतोड, वन क्षेत्रातील अतिक्रमण, वनवनवा, अवैध चराई आदी कामे केली. या कामात चुरस होण्यासाठी दरवर्षी जिल्हास्तर व राज्यस्तरावर उत्कृष्ठ काम करणाऱ्या समित्यांना संत तुकाराम वनग्राम योजना जाहीर केली. या योजनेतील 2016-17 या वर्षाचे निकाल जाहीर करण्यात आले असून यात लातूर जिल्हयातील निलंगा तालुक्यातील लांबोटा या गावाने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळविला आहे तर उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर तालुक्यातील कात्री या गावाला मराठवाडा प्रशासकीय विभागाने बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.