Sunday, 4 February 2018

पारंपारिक न्यायालयापेक्षा वेगळे न्यायालय असल्याने पक्षकारांना वेगळया पध्दतीने न्याय मिळवून देणे गरजेचे - पालक न्यायमूर्ती व्ही.के. जाधव

उस्मानाबाद, दि.04 :-   मानसिक स्वास्थ गमावून बसलेल्या जोडप्यांना खूप वेगळया पध्दतीने हाताळून नेमका मार्ग शोधणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमूर्ती तथा उस्मानाबादचे पालक न्यायमूर्ती श्री. व्ही. के. जाधव यांनी व्यक्त केले.
येथील कौटुंबिक न्यायालयाच्‍या  उद्घाटन  समारंभात ते बोलत होते. पालक न्यायमुर्ती कौटुंबिक न्यायालय, महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद विभागाच्या श्रीमती  विभा कंकणवाडी व उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमूर्ती तथा उस्मानाबादचे पालक न्यायमूर्ती श्री. व्ही. के. जाधव यांच्या हस्‍ते येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कौटुंबिक न्यायालयाचे उद्घाटन झाले.   
यावेळी उस्मानाबादचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर देशमुख, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश ए.पी. कानडे, जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड निलेश डी. बारखडे, जिल्‍हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.   



श्री. जाधव पुढे म्हणाले की, 13 वे कौटुंबिक न्‍यायालयाचे रितसर उद्घाटन उस्मानाबाद येथे झाले आहे. या न्‍यायालयात येणाऱ्या व्‍यक्‍ती  निराश, कौटुंबिक कलहामुळे जीवनावरील विश्‍वास उडालेल्‍या असतात. येथील वातावरणामुळे त्‍यांना संवादासाठी वेळ मिळेल आणि घटस्‍फोटासाठी आलेल्‍या व्‍यक्ती परत आनंदात एकत्र जातील, अशा रितीने कामकाज करुन जास्तीत-जास्त प्रमाणात कुटुंब जोडण्यासाठी या न्यायालयाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
समाजातील एकत्र कुटुंब पध्‍दतीचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल चिंता व्‍यक्‍त करत, पूर्वी एकत्र कुटुंब पध्‍दती होती, घरांतील ज्‍येष्‍ठ सदस्‍यांच्‍या मध्‍यस्‍थीमुळे पती-पत्‍नीतील वाद संपुष्‍टात यायचे. बदलत्‍या  जीवनशैलीमुळे कौटुंबिक वादाचे प्रमाण वाढत आहेत. जीवनात सुबत्‍ता असलेल्‍या व्‍यक्‍ती कौटुंबिक कलहामुळे त्रस्‍त असल्‍याची उदाहरणे देऊन कौटुंबिक न्‍यायालयांमध्‍ये येणाऱ्या व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आनंद, आशा निर्माण करण्‍याची मोठी जबाबदारी या क्षेत्रात काम करणाऱ्यांवर असल्‍याचे प्रतिपादन पालक न्यायमुर्ती कौटुंबिक न्यायालय, महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद विभागाच्या श्रीमती  विभा कंकणवाडी  यांनी यावेळी केले.
कौटुंबिक न्‍यायालयाच्‍या स्‍थापनेचा उद्देश सांगून विभक्‍त झालेले आणि घटस्‍फोटासाठी वेगवेगळ्या मार्गांनी या न्‍यायालयात आलेली जोडपी एकत्रित समाधानकारकपणे आपल्‍या मुलांचा हात हातात घेऊन येथून बाहेर जातील, असा विश्वास देत येथील कौटुंबिक न्यायालयाचे कार्यक्षेत्र शहर मर्यादित असून त्याचे कार्यक्षेत्र तालुका मर्यादित करण्यात यावे अशी मागणी यावेळी विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड निलेश बारखडे यांनी प्रास्ताविकात केली.  
शेवटी, कौटुंबिक न्यायालयात न्यायालयीन कक्षाची रचना विशिष्ट पध्दतीने करण्यात आली असून पक्षकारांसाठी बसण्यासाठी स्वतंत्र प्रतिक्षालय, सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचे सांगून उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश ए.पी. कानडे यांनी केले.  
यावेळी उस्मानाबाद जिल्हयातील विधीज्ञ, पत्रकार मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.