Monday, 26 September 2016

उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील गावांची जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी





उस्मानाबाद,दि.25:- उस्मानाबाद जिल्हयात गेल्या चार-पाच दिवसात जोरदार पाऊस झाल्याने जिल्हयातील नदी –नाले, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, साठवण तलाव, पाझर तलाव भरून त्यापासून होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील काही गावांना शनिवार दि.24 सप्टेंबर रोजी भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला.
उस्मानाबाद तालुक्यातील मेडसिंगा पाझर तलाव, शेत शिवाराची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला,कामेगाव बॅरेगेजच्या पाण्याची पाहणी करून तेर शिरपूर पॅटर्न, तेरणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठयाची पाहणी केली. तसेच कळंब तालुक्यातील मांजरा नदीच्या पुलावर जावून पूराची पाहणी करून पाणीसाठयाबाबत माहिती घेतली.
गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस होत असल्याने नदी –नाले, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प साठवण तलाव, पाझर तलाव भरून त्यापासून होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या अनुषंगाने पाहणी करूण महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग व सर्व संबंधित यंत्रणेला सतर्क राहण्याच्या व मंडळ अधिकारी व तलाठी यांना मुख्यालयास राहण्याबाबत सूचना केल्या.

यावेळी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कळंब उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, तहसिलदार अशोक नांदगावकर, नायब तहसिलदार राजेश जाधव,संबंधित यंत्रणेचे शाखा अभियंता,मंडळ अधिकारी चौरे, कुलकर्णी, नाईकनवरे, तलाठी पवार व थोरात तसेच अधिकारी इतर कर्मचारी उपस्थित होते.