Friday, 25 November 2016

बँकांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात – विजयालक्ष्मी बिद्री


          



उस्मानाबाद,दि.25:-
500 व 1000 रुपयांच्या  नोटांवर बंदी  आणि  या पार्श्वभूमीवर चलन बदल  निर्माण  झालेल्या  परिस्थितीत बँकांनी  ग्रामीण  भागातील  जनतेसाठी  विशेषत:  ज्या ग्रामीण भागात  एटीएम  मशिन्स  नाहीतच  अशा ठिकाणी  विशेष लक्ष देवून  त्या भागातील  जनतेला  जुने पैसे  बदलणे किंवा  नव्या नोटांचा  पुरवठा  कसा होईल यावर विशेष  उपाययोजना  कराव्यात , अशी सूचना  केंद्र शासनाच्या विशेष पथकाच्या सदस्या  विजयालक्ष्मी बिद्री यांनी काल येथे केली .

रुपये 500 व 1000 च्या नोटाबंदीमुळे उद्भवलेली परिस्थिती  आणि प्रत्येक  राज्याने, , जिल्ह्याने  त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या  उपाययोजना  त्याची फलश्रुती , सद्य:स्थितीत  उद्भवलेल्या  नव्या अडचणी  याबाबतचा  आढावा  घेण्यासाठी केंद्र शासनाच्या  वतीने  प्रादेशिक  संचालक स्टाफ सिलेक्शन कमिशन, कर्नाटक श्रीमती विजयालक्ष्मी बिद्री  या उस्मानाबाद  जिल्ह्यात  आल्या होत्या .  त्यावेळी  जिल्हाधिकारी  कार्यालयात  आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या .

यावेळी  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  आनंद रायते , अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक ,  अप्पर पोलीस अधीक्षक  दिपाली घाटगे , निवासी  उपजिल्हाधिकारी  सुनिल यादव ,  उपजिल्हाधिकारी  प्रभोदय मुळे , शिल्पा करमरकर , जिल्हा कृषी अधीक्षक  शिरीष जमदाडे , जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप , जिल्हा उपनिबंधक  बी.ए.शिंदे हे उपस्थित होते .

श्रीमती बिद्री म्हणाल्या, केंद्र शासनाने देशातील काळा पैसा नष्ट व्हावा,अतिरेक्यांना पुरविली जाणारी आर्थिक रसद बंद पडावी, देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळावा याकारिता 500 व 1000 च्या नोटा बंद करुन  नवे चलन सुरु केले. सुरुवातीचे काही दिवस  जनतेला, बँक कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. मात्र शासनाने जनतेला कमीत कमी त्रास व्हावा  याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले.  यामध्ये बँकांची  भूमिका निश्चितच महत्वपूर्ण राहिली आहे.

या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना सूचना देताना त्या पुढे म्हणाल्या, बँकांनी ग्रामीण भागातील विशेषत: ज्या भागात एटीएम मशिन्स नाहीत त्या भागात आवर्जून विशेष लक्ष द्यावे, लोकांना शासनाने ठरविल्याप्रमाणे पैसे मिळतील त्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करावेत, बॅकांची खाते संख्या लक्षात घेवून लीड बँकेने तथा मुख्य बँकांनी इतर बँकांना पैसे पुरवावेत.  पैसे बदलून घेण्यासाठी वा काढण्यासाठी ज्या ठिकाणी गर्दी असेल तिथे टोकन नंबर देवून लोकांना वेळा ठरवून द्याव्यात. बँकेत पैसे बदलून घेण्यासाठी  आलेल्या  ग्राहकांच्या बोटावर  शाई किंवा परमनंट  मार्करने खूण करावी.


श्रीमती बिद्री यांनी लोकांनाही आवाहन केले आहे की, त्यांचे जास्तीत जास्त व्यवहार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने करावेत, पेटीएम ची सुविधा वापरावी , एटीएम मशिनचा जास्तीत जास्त वापर कारावा, रेशन दुकानदारानीही त्यांचे व्यवहार ऑनलाईन करावेत. जनतेने व्यवहार करताना सावध असावे, आपलाच पैसा बँकांमध्ये जमा करावा, दुसऱ्या व्यक्तीचे पैसे जमा करणे व बदलून मिळण्यासाठी जर दिले तर ते घेवू नयेत.  त्या पुढे इतर विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना म्हणाल्या की, कृषी खात्याने जिल्हा ग्रामीण बँकांशी समन्वय साधून शेतकरी कर्ज,  शेतकरी विमा यांना लक्ष घालावे. पिक विमा भरण्यासाठी  जुन्याच नोटा         वापरण्याची परवानगी मिळणेबाबत त्या वरिष्ठ पातळीवर बोलतील.प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मोटार सायकल, चारचाकी वाहने यांच्या खरेदीत वाढ झाली किंवा कसे याबाबत आढावा घेवून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल द्यावा .


बैठकीच्या  सुरुवातीस  जिल्हाधिकारी डॉ.  नारनवरे यांनी चलनबदलाच्या निर्णयामुळे  उस्मानाबाद जिल्ह्यात  निर्माण  झालेली परिस्थिती आणि  प्रशासन व  इतर यंत्रणांनी  केलेल्या  जनतेला  जास्तीत जास्त  मदत होईल यासाठी  केलेल्या उपाय योजना  याबाबतचे  सविस्तर सादरीकरण केले.


शेवटी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी श्रीमती बिद्री व उपस्थित सर्वांचे आभार मानले. या बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांसह सर्व बँकांचे व्यवस्थापक उप‍स्थित होते.
*****