उस्मानाबाद, दि.21:- आज 57 व्या पोलीस हुतात्मा दिनानिमित्त येथील पोलीस
मुख्यालय येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हा प्रमुख
न्यायाधीश श्री रमेश देशमुख हे उपस्थित होते. दि. 21 ऑक्टोबर 1959 रोजी हॉट स्प्रिंग्ज या सीमेवरील बर्फाच्छादित
निर्जन ठिकाणी गस्त घालणाऱ्या भारतीय
जवानांवर चिनी सैनिकांनी अमानुष हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दहा भारतीय
जवान शहीद झाले . तेव्हापासून दरवर्षी 21 ऑक्टोबर या दिवशी वीर शहीद
शिपायांची आठवण म्हणून या दिवशी संपूर्ण
भारतात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो.
सर्वप्रथम पोलीस अधीक्षक श्री.
पंकज देशमुख यांनी उपस्थितांना 21 ऑक्टोबर
या दिनाचे महत्व सांगितले. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. रमेश देशमुख यांनी ज्याप्रकारे सैनिकांमुळे
देशाच्या सीमा सुरक्षित आहेत त्याप्रमाणे देशातील अंतर्गत सुरक्षा पोलिसांमुळे अबाधित
आहे व पोलिसांमुळे आपण सर्वजण रात्री निश्चिंतपणे झोपू शकतो, अशा शब्दात आपले
मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मान्यवराच्या हस्ते
स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच हवेत बंदुकीच्या 21 फैरी झाडून
हुतात्म्यांना सलामी देण्यात आली.
या कार्यकमास अप्पर पोलीस
अधीक्षक राजतिलक रोशन, जिल्हा सरकारी वकील श्री.जाधवर, पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस
निरीक्षक श्री. हरिष खेडकर यांनी केले.