उस्मानाबाद,दि.17: मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी झालेले
स्वातंत्र्यसैनिक आयुष्यभर क्रियाशील
राहिले आणि आजही क्रियाशील आहेत. अशा या महान स्वातंत्र्यसैनिकांनी समग्र विकासाचा
जो ध्यास धरला होता, तो ध्यास
पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. त्यासाठी आजच्या या विशेष दिवशी आपण सर्वजण मिळून आपल्या जिल्हयाला विकसित जिल्हा
म्हणून ओळख मिळवून देण्याचा संकल्प करूया असे आवाहन पालकमंत्री डॉ. दीपक
सावंत यांनी आज जिल्हधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित मराठवाडा
मुक्ती संग्राम दिनाच्या 68 व्या वर्धापनादिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी केले.
प्रारंभी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी पालकमंत्री
डॉ. दीपक सावंत व अन्य मान्यवरांनी हुतात्मा स्मृतीस्तंभास पुष्पचक्र वाहून
अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना
दिली. पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण होताच पोलीस दलाने
राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. सावंत
यांनी यावेळी समारंभाला
उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,अधिकारी कर्मचारी, पत्रकार व नागरिकांना शुभेच्छा
दिल्या.
यावेळी पालकमंत्री डॉ.दीपक
सावंत म्हणाले की,आपल्या जिल्ह्यातील
देवधानोरा, नंदगाव , चिलवडी अशा गावांना या संग्रामात फार हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. यात चिलवडीचे रामलिंग जाधव,
देवधानोऱ्याचे महादेव बोंदर, लक्ष्मण बोंदर, मुरूडचे शिवाजी नाडे, उस्मानाबादचे
भास्करराव नायगावकर, जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष नामदेवराव माने तसेच ज्यांनी या
स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला, आपले प्राणार्पण केले अशा सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या
त्यागाची आम्हाला सदैव जाणीव राहील. अशा सर्व हुताम्यांना मी
अभिवादन करतो. त्या सर्व गावकऱ्यांची आणि त्यांनी सोसलेल्या कष्टांची
आपण नेहमीच कृतज्ञतेने आठवण ठेवली पाहिजे.
ते पुढे म्हणाले,मागील दोन-तीन दिवसात जिल्हयात झालेल्या पावसामुळे
येथील शेतकऱ्यांमध्ये निश्चितच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हयातील
शासन यंत्रणेमार्फत विविध विभागांच्या योजना प्राधान्याने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध
करुन देण्याबाबतची अंमलबजावणीही जिल्ह्यात धडाडीने सुरु आहे. नुकताच माननीय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने विदर्भ मराठवाडयातील दूध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ संचलित मदर
डेअरी फ्रुट ॲन्ड व्हेजिटेबल कंपनीशी राज्य शासनाने सामंजस्य करार केला आहे.यात
विदर्भ मराठवाडयातील जवळपास दोन हजार गावातील साठ हजार ग्रामीण कुटुंबांना
उपजीविकेचे साधन मिळणार आहे.ही मराठवाडयाच्या आणि आपल्या जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे असेही ते
म्हणाले.
जिल्हयात विविध शासकीय विभागांकडून योजनांचा प्रचार, प्रसार व
प्रसिध्दी अशा विविध उपक्रमांचे आयोजन मोठया प्रमाणावर सातत्याने करण्यात येत आहे,याबद्दल
त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्हा पोलिस दलाने
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देवून निर्भया दिदी आणि निर्भया पथक यासारख्या
उपाययोजना राबविल्या आहेत. राज्यात एकाच वेळी एकूण 44 सायबर सेल चे उद्घाटन करून
आधुनिक गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने शासनाने एक महत्वाचे पाऊल उचलले असल्याचे
सांगून जिल्हयात राबविलेल्या शेततळी,जलयुक्त शिवार,कृषी क्रांती कॉमन फार्मर्स
फोरम आदी बाबींचा त्यांनी उल्लेख केला.
यावेळी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने
बळीराजा चेतना अभियानांतर्गत पशुस्वास्थ्य प्रमाणपत्राचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत
यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला खासदार रवींद्र गायकवाड,आमदार राणा जगजितसिंह
पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज
पाटील,उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरूजी विविध पदाधिकारी, विविध मान्यवर यांच्यासह परिविक्षाधीन
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक
पंकज देशमुख, जि.
प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते,अपर
जिल्हाधिकारी अविनाश पाठक,अपर पोलीस अधीक्षक दीपाली घाटगे, निवासी
उपजिल्हाधिकारी श्री. उध्दव घुगे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय
मुळे, अरविंद लाटकर, श्रीरंग तांबे,जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे, जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, अजिंक्य पवार, समाज कल्याण अधिकारी
एस.एम. मिनगिरे,तहसिलदार सुजित नरहरी आणि जिल्हयातील सर्व विभागांचे अधिकारी-
कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सूत्रसंचलन हणमंत पडवळ यांनी केले.