Tuesday, 20 September 2016

पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याकडून जिल्हा वार्षिक योजनाच्या निधीचा आढावा व मार्गदर्शक सूचना


उस्मानाबाद दि. 20:-जिल्हा वार्षिक योजना(सर्वसारधाण)सन 2016-17 अंतर्गत रूपये 17492.00 लक्ष, अनु.जाती उपयोजनाकरिता रूपये 6292.00 लक्ष व आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजनाकरिता रूपये 215.57 लक्ष अशा एकूण तीनही योजनांकरिता रूपये 23999.57 लक्ष नियतव्यय मंजूर आहे, याचा पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आढावा घेवून सबंधित अधिकाऱ्यांना हा  निधी खर्च विहित मार्गाने लवकरात लवकर खर्च करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस खासदार रविंद्र गायकवाड, आमदार मधुकरराव चव्हाण,आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राहुल मोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड. धिरज पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरूजी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते तसेच जिल्हा नियोजन समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2016-17 करिता 17492.00 लक्ष नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी नियमित योजनेकरिता रूपये 13268.00 लक्ष व जलयुक्त शिवार अभियानाकरिता रूपये 4224.00 लक्ष नियतव्यय मंजूर आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2015-16 अंतर्गत माहे ऑगस्ट 2016  अखेर रूपये 4164.47 लक्ष निधी वितरीत करण्यात आला असून त्यापैकी माहे ऑगस्ट 2016 आखेर 908.02 लक्ष निधी खर्च झाला आहे. वितरित तरतुदीच्या खर्चाची टक्केवारी 21.80 टक्के आहे.
जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2016-17 करिता 6292.00 लक्ष नियतव्यय मंजूर करण्यात असून माहे ऑगस्ट 2016 अखेर रू.3058.00 लक्ष निधी वितरित करण्यात आला असून त्यापैकी ऑगस्ट  2016 अखेर रूपये.2192.79 लक्ष निधी खर्च झाला आहे.वितरित तरतुदीच्या खर्चाची टक्केवारी 71.69 टक्के इतकी  आहे.  
            जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी क्षेत्राबाहेरील आदीवासीकरिता उपयोजना) सन 2016-17 करिता रूपये 215.57 लक्ष नियतव्यय मंजूर असून माहे ऑगस्ट 2016 अखेर रूपये 162.57 लक्ष निधी वितरित करण्यात आला असून त्यापैकी माहे ऑगस्ट 2016 अखेर रूपये 27.83 लक्ष निधी खर्च झाला आहे. वितरित तरतुदीच्या खर्चाची 17.12 टक्के इतकी आहे.
            बैठकीच्या प्रारंभी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तसेच खासदार,आमदार यांच्या सूचना अवगत असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निधी खर्चाबाबत स्पष्ट सूचना दिल्या. यावेळी पालकमंत्री डॉ.दीपक सावंत  यांनी जिल्हयातील शेतीविषयक अनुदानाकरिता व प्रलंबित प्रस्तावाबाबत मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन केले जाईल असे घोषित केले तसेच जिल्हयातील 17 टॅंकर्सची गळती असल्याचे आढळून आल्याने त्यांचा मोबदला अदा करण्यात येवू असे आदेश दिले. शिराढोण येथील  ग्रामीण रूग्णालयाच्या मंजूरीबाबत मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचे डॉ.दीपक सावंत यांनी सांगितले.
            कसबेतडवळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याची जागा स्मारक म्हणून होण्यासाठी व जतन  करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
            जिल्हयातील पीक परिस्थितीची वस्तुनिष्ठ पाहणी करून ताबडतोब पंचनामे करावेत अशा सूचना  देवून अधिकारी वर्गाने शेतीची नजर आणेवारी भौगोलिक,सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा विचार करून सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, असे सांगून डॉ. सावंत पुढे म्हणाले, भूम, परंडा तालुक्यातील पीक नुकसानीचे लागलीच सर्वेक्षण करावे तसेच शेतीसाठी पाणी पुरविण्यासाठी वीजपुरवठा खंडीत होवू नये यासाठी एक्सप्रेस फिडर सुरू करावेत यासाठी लागणाऱ्या खर्चास जिल्हा नियोजन समितीत मंजूरी देण्यात येईल.
            या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसाठी शासनाकडे रूपये 200 कोटी अनुदान मागणीचा ठराव,मानव विकास योजनेत उस्मानाबाद जिल्हयाचा  समावेश करून घेण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत नाबार्डकडून उस्मानाबादमधील सिंचन योजनांना अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा  करावा तसेच चारा छावणीचे उर्वरित राहिलेली देयके ताबडतोब अदा करावीत असे आदेशही डॉ.सावंत यांनी दिले. स्त्री रूग्णालयात येत्या पंधरा दिवसात सोनोग्राफी मशिन बसविण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे,प्रवीण पवार, जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, अजिंक्य पवार, समाज कल्याण अधिकारी एस.एम. मिनगिरे तसेच जिल्हयातील इतर सर्व विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.