Wednesday, 5 August 2026

जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागाला शुद्ध पाणीपुरवठ्याची नवी दिशा ३४६ योजना पूर्ण; ९१.६६ टक्के घरांना नळजोडणी, २९७ गावे 'हर घर जल' घोषित

जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागाला शुद्ध पाणीपुरवठ्याची नवी दिशा ३४६ योजना पूर्ण; ९१.६६ टक्के घरांना नळजोडणी, २९७ गावे 'हर घर जल' घोषित धाराशिव,दि.५ जुलै (जिमाका) ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील कामांना वेग आला आहे.जिल्ह्यात एकूण ५९४ पाणीपुरवठा योजना मंजूर असून, त्यापैकी ५९३ योजनांना कार्यारंभ देण्यात आला आहे.यापैकी ३४६ योजना पूर्ण झाल्या असून,६० योजना ० ते ५० टक्के,तर १८७ योजना ५० ते ९९ टक्के प्रगतीपथावर आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा (एफएचटीसी) करण्यासाठी जिल्ह्यास २ लाख ८८ हजार ५५९ नळजोडण्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.त्यापैकी २ लाख ६४ हजार ४८० नळजोडण्या पूर्ण झाल्या असून,हे प्रमाण ९१.६६ टक्के इतके आहे.तसेच ५३३ गावे 'हर घर जल' नोंदीत आली असून, त्यापैकी २९७ गावे 'हर घर जल' म्हणून घोषित करण्यात आली आहेत. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १९९ योजनांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.त्यापैकी १२० योजनांना शासनाची मान्यता मिळाली असून,५० प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.उर्वरित २९ प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आवश्यक ते बदल करून प्रस्ताव अंतिम करण्यात येत आहेत.याशिवाय संभाव्य १४ व्या एसएलएससी बैठकीसाठी ७५ योजनांचे आराखडे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले असून, शासनाची परवानगी मिळताच ते सादर करण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायतींकडून नव्याने ३९ गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत ५९४ योजनांसाठी ३८३.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यापैकी आजपर्यंत १८८.३७ कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून,प्राप्त झालेला संपूर्ण निधी योजनांच्या अंमलबजावणीवर खर्च करण्यात आला आहे. पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी जलतारा उपक्रमांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ८०६ जलतारे,तर पंचायत समित्यांमार्फत लोकसहभागातून ४ हजार ६२१ जलतारे उभारण्यात आले आहेत. दरम्यान,सध्याच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ६ गावांना ८ टँकरद्वारे,तर ७१ गावांसाठी १३५ विंधन विहिरींचे अधिग्रहण करून पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत व सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील आहे. ******