Thursday, 14 May 2026

आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व विभागांनी सज्ज राहावे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मान्सून २०२६ पूर्व तयारी आढावा बैठक

आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व विभागांनी सज्ज राहावे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मान्सून २०२६ पूर्व तयारी आढावा बैठक * मान्सूनपूर्व तयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज * विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित * १ जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित होणार धाराशिव दि.१४ मे (जिमाका) सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सराव आयोजित करावेत.विशेषतः तहसीलदार व नगरपालिकांनी आपल्या कार्यक्षेत्रात आपत्कालीन सराव घेताना संबंधित साहित्याचा प्रत्यक्ष वापर करावा.पाळीव जनावरांचे वेळेवर लसीकरण करण्यात यावे.तसेच गायरान जमिनीवर चारा लागवडीसाठी आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अतिवृष्टीऐवजी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी कोणती पर्यायी पिके घ्यावीत,याचे नियोजन आतापासूनच करावे.आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व विभागांनी सज्ज राहावे. असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले. आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सून २०२६ पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार बोलत होते.या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके,जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी होते. जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,तलावांवर संबंधित विभागाचे नाव,अधिकाऱ्याचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक असलेले फलक लावण्यात यावेत.त्यामुळे संबधित गावातील सरपंच व लोकप्रतिनिधी यांना संबंधित अधिकाऱ्यांशी वेळीच संपर्क साधता येईल.आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच धोक्याची सूचना देणारे बोर्ड उभारावेत.आपत्कालीन परिस्थितीत मदत करणाऱ्या आणि पोहणाऱ्या व्यक्तींची यादी तयार ठेवावी.वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपत्तीच्या काळात दिरंगाई केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होऊ शकणारे वाकलेले पोल, लोंबकळणाऱ्या तारा व धोकादायक वीज यंत्रणेचे सर्वेक्षण करून दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत.उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत ठेवावेत.सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थित राहून आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन जबाबदारीने काम करावे.तसेच २४ तास आपत्ती निवारण कक्ष सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. कोणत्याही अधिकाऱ्याने पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत पूर,अतिवृष्टी,वादळ, दरडी कोसळणे,गारपीट आदी संभाव्य आपत्तींच्या अनुषंगाने विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १ जून २०२६ पासून जिल्हा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असून, तालुकानिहाय व मंडळनिहाय पावसाची माहिती संकलित केली जाणार आहे.जिल्हा परिषदेला गावांच्या स्थलांतर नियोजनासह तलाव,पूल,रस्ते आणि पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेण्याच्या सूचना यावेळी श्री.पुजार यांनी दिल्या. पोलीस विभागाला बचाव पथके तयार ठेवणे,नदीकाठच्या गावांतील पोहणाऱ्यांची यादी तयार ठेवणे तसेच पूरस्थितीत तातडीने मदत कार्य राबविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.पाटबंधारे विभागाला धरणे व तलावांची नियमित तपासणी,पाणीपातळीवर लक्ष ठेवणे तसेच धरणातून पाणी सोडण्यापूर्वी ४८ तास अगोदर संबंधित ग्रामपंचायत तसेच प्रशासनाला माहिती देण्याचे निर्देश श्री.पुजार यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते,पूल व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ठिकाणांची दुरुस्ती आणि पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.महावितरण विभागाला पावसाळ्यात वीजपुरवठा अखंडित ठेवणे,धोकादायक तारा व पोल दुरुस्त करणे आणि आपत्कालीन ठिकाणी लोडशेडिंग टाळण्याचे निर्देश देण्यात आले.उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करून २४ तास कार्यान्वित ठेवण्यास सांगण्यात आले.तलाठी,ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी आपत्तीची माहिती तात्काळ सादर करावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री.पुजार यांनी स्पष्ट केले. श्रीमती.खोखर यावेळी म्हणाल्या की,प्रत्येकाने आपली जबाबदारी वेळीच पार पाडावी.त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होणार नाही तसेच तणाव निर्माण होणार नाही असे त्या म्हणाल्या. श्री.कडवकर यांनी आरोग्य विभागाला साथीचे रोग टाळण्यासाठी औषधसाठा उपलब्ध ठेवणे,गावांमध्ये आरोग्य सेवा तत्काळ पोहोचविणे तसेच सर्पदंश प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.कृषी विभागाला पिकांच्या नुकसानीचे पंचनामे,रोग प्रतिबंधक उपाययोजना व शेतकरी जनजागृतीची जबाबदारी देण्यात आली आहे.जिल्हा पुरवठा विभागाला अन्नधान्य व केरोसीनचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. पशुसंवर्धन विभागाला जनावरांच्या साथीच्या रोगांपासून संरक्षणासाठी लसीकरण आणि औषधसाठा उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आले. नगर परिषदांना गटारी,नाले स्वच्छता धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण, नदीकाठावरील अतिक्रमण हटविणे तसेच पावसाळ्यापूर्वी शहरांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना यावेळी श्री . कडवकर यांनी दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा,पूर व यात्रांसंदर्भातील एसओपी अद्ययावत करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच १०७७ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित ठेवण्याबाबतही सूचना देण्यात यावेळी देण्यात आल्या.मान्सून काळात सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी दक्ष राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. *******