Friday, 1 May 2026
समृद्ध,सक्षम आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्यासाठी धाराशिव विकासाच्या नव्या युगात पालकमंत्री प्रताप सरनाईक ६७ वा महाराष्ट्र स्थापना दिवस साजरा
समृद्ध,सक्षम आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्यासाठी धाराशिव विकासाच्या नव्या युगात
पालकमंत्री प्रताप सरनाईक
६७ वा महाराष्ट्र स्थापना दिवस साजरा
धाराशिव दि.१ मे (जिमाका) महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात विकास,डिजिटल परिवर्तन, उद्योगवाढ,आरोग्य सुविधा आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुलभ,सुरक्षित आणि सन्मानपूर्ण बनत असून ‘समृद्ध, सक्षम आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने धाराशिव जिल्हा वेगाने पुढे जात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
आज १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ६७ व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्ताने मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना श्री. सरनाईक बोलत होते.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर,बुबा साहेब जाधव श्रीमती कलावती उमरे,श्रीमती भागीरथी कुकडे, भागीरथी गुरव,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती.अर्चना पाटील,उपाध्यक्षा श्रीमती.उषा गायकवाड,महिला व बाल कल्याण समिती सभापती पूजा शिंदे,माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलिस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की, प्रशासनात डिजिटल परिवर्तनामुळे नागरिकांना अधिक जलद,सुलभ आणि पारदर्शक सेवा उपलब्ध होत आहेत. ‘डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड’,‘कल्पवृक्ष स्मार्ट जीआर’,‘जीवनरेखा’ आणि ‘तुळजाई चॅटबॉट’ यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जमिनीचे दाखले,विविध प्रमाणपत्रे,तक्रार निवारण आणि शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत अधिक सुलभतेने पोहोचत आहे.परिणामी वेळ,श्रम आणि आर्थिक खर्चात मोठी बचत होत आहे.औद्योगिक क्षेत्रात जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून गुंतवणूक वाढीस लागली असून हजारो रोजगार संधी निर्माण होत आहेत.विविध औद्योगिक क्लस्टर प्रकल्पांमुळे ‘आत्मनिर्भर धाराशिव’ या संकल्पनेला अधिक बळ मिळत असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,वाहतूक क्षेत्रातही राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत मोठे बदल घडत आहेत.मागील वर्षभरात धाराशिव विभागात नव्या बसेसची वाढ झाली असून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना अधिक सुरक्षित,विश्वासार्ह आणि सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध झाली आहे. लवकरच ग्रामीण भागात ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू होणार असल्याने ग्रामीण वाहतुकीला नवी दिशा मिळणार आहे.पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे.‘आपली एसटी’ मोबाईल अॅपमुळे प्रवाशांना बसचे वेळापत्रक,मार्ग आणि सेवा माहिती सहज उपलब्ध होत आहे.असे श्री.सरनाईक यावेळी म्हणाले.
आरोग्य क्षेत्रात जिल्ह्यात ऐतिहासिक बदल घडत असल्याचे सांगून श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,आधुनिक रुग्णालये, आयसीयू,एमआरआय,डायलिसिससह अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत. ग्रामीण भागातही नव्या आरोग्य संस्थांची उभारणी सुरू असून “आरोग्य सेवा आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे.गृह,शेती आणि सामाजिक क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना,शिवभोजन योजना,उज्ज्वला गॅस योजना,मनरेगा आणि जल जीवन मिशनसारख्या योजनांमुळे सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुरक्षित,सन्मानपुर्ण आणि सुलभ बनत आहे.असे त्यांनी सांगितले.
शेतकरी बांधवांसाठी कृषी,सिंचन, पीकविमा,तंत्रज्ञानाधारित शेती आणि नैसर्गिक शेती उपक्रमांमुळे शेती अधिक सक्षम होत आहे.असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे कृषी क्षेत्रातही नवे परिवर्तन घडत आहे. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रस्ते,पाणीपुरवठा,पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासकामांना गती मिळाली असून जिल्हा प्रगतीच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे.महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव नसून विकास,सामाजिक न्याय,लोककल्याण आणि आत्मनिर्भरतेच्या सामूहिक निर्धाराचा दिवस असल्याचा संदेश देत नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा.विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि समृद्ध,सक्षम व प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी हातभार लावावा,असे आवाहन पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमस्थळी आगमन होताच प्रारंभी पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी राष्ट्रध्वजारोहण केले.पोलिस पथकाने राष्ट्रगान,राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले व राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.पालकमंत्री व मान्यवरांनी शहीद स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहिली.
पालकमंत्री श्री.सरनाईक यांच्या हस्ते कळंब तालुक्यातील शिराढोण येथील ग्राम महसूल अधिकारी विनोद चुकेवाड यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार बांधव व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हणमंत पडवळ यांनी केले.
******



