Thursday, 19 February 2026
वंदे मातरमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याची दिमाखदार सांगता
वंदे मातरमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याची दिमाखदार सांगता
धाराशिव दि.१९ फेब्रुवारी (जिमाका) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.देशभक्ती, स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्राभिमानाने ओतप्रोत भरलेल्या या सोहळ्याची सांगता आज ‘वंदे मातरम’ या गीताने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात विजया कडवकर यांनी सादर केलेल्या “इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर ना होना” या भावगीताने झाली.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर उपस्थितांनी एकत्रितपणे “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्र गीत गायले आणि सभागृह देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमून गेले.यानंतर विजया कडवकर व वैभवी कडवकर या भगिनींनी जिजाऊ वंदना सादर करून मातृशक्तीचे स्मरण घडविले. प्रसिद्ध शिवशाहीर सुभाष गोरे आणि त्यांच्या संघाकडून “मानाचा मुजरा” हा पोवाडा सादर करण्यात आला. पुढे शिवशाहीर बंडू खराटे व त्यांच्या संघाने “पुत्र जो झाला जिजाऊला, झाला आनंद शिवनेरीला” या पोवाड्याद्वारे शाहीरी जलसा रंगविला.या सादरीकरणातून शिवचरित्रातील पराक्रम,स्वराज्याची संकल्पना आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले.तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, धाराशिवच्या वतीने विशाल शिंगाडे व सहकलाकारांनी विविध लोकगीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे,लोहारा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती. वैशाली खराडे,नगरसेविका कमला लोडगे,तहसिलदार मृणाल जाधव व प्रकाश व्हटकर,विविध विभागांचे अधिकारी - कर्मचारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.
कडवकर भगिनींनी भरतनाट्यम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.तसेच अवघ्या पाच वर्षांच्या शिवश्री श्रीकांत गवळी या चिमुकल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भाषण सादर करून सभागृह भारावून टाकले. “गोधळ मांडला ग माय अग अंबाबाय,गोंधळाला ये” हे बहारदार गीत नृत्यासह सादर करण्यात आले आणि कार्यक्रमाला रंगत आली.उपजिल्हाधिकारी श्रीमती.स्वाती शेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.राष्ट्रप्रेम आणि स्वराज्यभावनेचा संदेश देत ‘वंदे मातरम’ या गीताने दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या संपूर्ण सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, आदर्श,स्वराज्य संकल्पना आणि राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य योगदानाचे प्रभावी वर्णन शिवशाहीरांनी पोवाड्यांच्या माध्यमातून उपस्थितांना ऐकविले.अधिकारी -कर्मचारी,नागरिक,मान्यवर तसेच विद्यार्थी व युवक-युवती यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सांस्कृतिक सोहळा अविस्मरणीय ठरला.
*****




