Wednesday, 5 September 2018

समाजाला दिशा देण्याचे व समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात -आमदार राणाजगजितसिंह पाटील


     गावच्या विकासासाठी एकजूट व लोकसहभाग महत्त्वाचा असल्याने लोकसहभाग वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. समाजाला दिशा देण्याचे व समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात, असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आज येथे केले. 
    शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्काराचे वितरण नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहात बुधवार दि. 5 सप्टेंबर 2018 रोजी  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पंचायत समिती सभापती (उस्मानाबाद) बालाजी गावडे,पंचायत समिती सभापती (कळंब) दत्तात्रय साळूंके, पंचायत समिती सभापती (वाशी) श्रीमती. भाग्यश्री हाके, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गीते, उध्दव साळवी, दत्तात्रय देवळकर, वैभव मुंढे, मदन बारकुल, महेंद्र धुरगुडे, सुरेश कोरे, उषाताई यरकळ, अस्मिता कांबळे, जयश्री खंडागळे, सुनिता जाधव, प्रविण खटाळ, शिक्षणाधिकारी (प्रा.) कलिमोद्दिन शेख, शिक्षणाधिकारी (मा) शिवाजी चंदनशिवे, उपशिक्षणाधिकारी रोहीणी कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली.
     यावेळी पुढे बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील शिक्षकांनी चांगले काम केल्यामुळे जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत झाली आहे. शिक्षकांनी मोठया प्रमाणात लोकसहभागातून शाळा सुधारल्या आहेत त्याचबरोबर गावांचा देखील कायापालट केला आहे. त्यामुळे प्रत्येक कामात शिक्षकांची साथ महत्त्वाची आहे. गावात लोकसहभाग वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सीएसआरच्या माध्यमातून शिक्षणासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.
      यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील आपण केलेल्या कामाचे मूल्यमापन व्हावे, कौतुक व्हावे म्हणून पुरस्काराचे वितरण करण्यात येत असून प्रत्येक शिक्षकांनी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा यासारखे काम करावे, अशी आशा व्यक्त केली. शिक्षकांनी केलेल्या कामामुळे जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी संख्या वाढली आहे.
यावेळी जिल्हा परिषद, उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी मोठया प्रमाणात जिल्हा परिषदेच्या सेस मधून तरतूदही करण्यात येत आहेत. डिजिटल शाळा, आरओ प्लाँट, शाळेसाठी गॅस सर्व विद्यार्थ्यांना गणवेष, बूट, सॉक्स आदी उपक्रम राबवून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील वर्षीपेक्षा जिल्हा परिषद शाळांची यावर्षी 12 हजार विद्यार्थी पटसंख्या वाढ झालेली आहे. त्याचबरोबर प्रश्नांची बँक तयार करुन सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यावर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये शिष्यवृत्तीही देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील थकीत वीज बिलासाठी ही जि.प.सेस मधून 89 लाख रुपयांची तरतूद आगामी
   जि.प.सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात येईल. शिक्षण विभागात महाराष्ट्रात अव्वल स्थानी जिल्हा येण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ. अर्चनाताई पाटील यांनी यावेळी सांगितले. 
    कांबळे अरुण नरहरी, फुलमामडी तौफी कुलआलम नुरुलअलीन, स्वामी रंजना कमलाकर, गायकवाड कमलाकर शामराव, खोसे उमेश रघुनाथ, देशमाने विजयकुमार गुरुनाथ, कांबळे तानाजी आप्पाराव, कांबळे सुब्राव गोरोबा, पखाले नामदेव भागवत, गादेकर विनोद भागवत, वाघोलीकर अभय शंकरराव, भोसले विजयकुमार बाबासाहेब, कांबळे तात्याबा बाबा, अंधारे अमोल रावसाहेब, बन बळीराम आदी 15 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कारांने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
    यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अमोल अंधारे, उमेश खोसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी कलिमोद्दिन शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले तर आभार उपशिक्षणाधिकारी श्रीमती. रोहीणी कुंभार यांनी मानले.  यावेळी शिक्षक, लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.