Monday, 9 March 2026
पुतळे उभारताना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार महापुरुषांचे पुतळे उभारणीबाबत बैठक
पुतळे उभारताना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
महापुरुषांचे पुतळे उभारणीबाबत बैठक
धाराशिव दि.९ मार्च (जिमाका) जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात थोर पुरुषांचे पुतळे उभारण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सादर करावा.काही ठिकाणी युवावर्ग अतिउत्साहात चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी पुतळे उभारतात.हे अत्यंत चुकीचे आहे.थोर पुरुषांचे पुतळे उभारताना राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
आज ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे उभारण्याबाबतच्या बैठकीत श्री.पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक श्रीमती.रितू खोखर,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार,नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सह आयुक्त श्री.त्र्यंबक ढेंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.पूजार म्हणाले की,पुतळा उभारण्यास अधिकृत परवानगी असली तरच संबंधित पुतळ्याच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी शासनाकडून निधी मिळू शकतो.चुकीच्या पद्धतीने पुतळे उभारल्यास कायमचे नुकसान आहे.ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे, त्या ठिकाणी तो उभारण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने पुतळा उभारणार्या युवा वर्गावर एकदा एफआयआर दाखल झाला तर युवा वर्गाचे भविष्य कायमचे खराब होते.त्यामुळे पुतळा उभारताना आवश्यक त्या परवानग्या घेऊनच पुतळा उभारावा असे श्री.पुजार यावेळी म्हणाले.
डॉ.श्री.घोष म्हणाले,आपण जो पुतळा उभारणार आहोत त्याच्या सर्व परवान्या घेणे आवश्यक आहे.केवळ परवानगी घेऊनच पुतळा उभारून चालणार नाही तर त्याची देखभाल करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.पुतळा उभारणार्या संस्थेने पुतळ्याच्या क्ले मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता घेऊनच पुतळा तयार करावा.मान्यता घेतलेल्या मॉडेल प्रमाणेच पुतळा उभारण्याची दक्षता घ्यावी. पुतळा उभारण्याचे परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर पुतळा उभारण्याबाबत परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे डॉ.श्री.घोष यावेळी म्हणाले.
श्रीमती.खोखर म्हणाल्या की,ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे,तो रीतसर पद्धतीने बसवावा.आवश्यक सर्व परवानग्या घेऊनच पुतळा उभारून महापुरुषांचा सन्मान राखावा.शासनाच्या मार्गदर्शक तत्वांच्या पालनातून पुतळा उभारावा.पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे,त्या ठिकाणी वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यक त्या परवानग्या घेऊनच पुतळा उभारावा.विशेषता पुतळे उभारताना युवा वर्गाने दक्षता घ्यावी.ज्यांनी चुकीच्या पद्धतीने व विनापरवानगीने जिथे पुतळे उभारले आहे,त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे श्रीमती.खोखर यांनी सांगितले.
पुतळे उभारण्याबाबत प्रत्येकाने जबाबदारीने वागावे असे सांगून श्रीमती.खोखर म्हणाल्या की,जाती धर्मात तेढ निर्माण होणार नाही अशाप्रकारच्या चुकीच्या पद्धतीने पुतळे उभारण्यात येऊ नये.भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही,याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी.ज्यांनी जे पुतळे अनधिकृत पद्धतीने उभारले आहेत,त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.त्यामुळे कायदेशीर पद्धतीनेच पुतळ्याची उभारणी करावी.असे श्रीमती.खोखर यावेळी म्हणाल्या.
या बैठकीला धाराशिव पंचायत समितीच्या सभापती श्रीमती.गोकर्णा कदम,शांतता समितीचे धनंजय शिंगाडे,प्रकाश जगताप, विश्वास शिंदे,मशायक सामीयुद्दीन,धनंजय राऊत,श्री.कुरेशी,प्रवीण सूर्यवंशी,शेख अयास,जाकीर पठाण,इस्माईल काझी, सिद्धार्थ बनसोडे,ज्ञानेश्वर करवट,गोपाल कदम,आबासाहेब बर्गे,सुनील अंबडेकर, नगरपालिकांचे मुख्याधिकारी सर्वश्री लक्ष्मण कुंभार,अजिंक्य रणदिवे,श्रीमती. शैला डाके,श्रीमती.सुरेखा कांबळे,जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक आमोद भुजबळ यांची तर ऑनलाइन पद्धतीने काही पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती,नगरपालिकांचे नगराध्यक्ष, सर्व उपविभागीय अधिकारी,सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,सर्व तहसीलदार,सर्व गटविकास अधिकारी,सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक उपस्थित होते. यावेळी सभागृहात उपस्थित शांतता समितीच्या काही सदस्यांनी पुतळा उभारण्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.निवासी उपजिल्हाधिकारी श्री.कडवकर यांनी प्रास्ताविकातून पुतळे उभारण्यासंबंधीच्या राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती यावेळी दिली व उपस्थितांचे त्यांनी आभार मानले.
******

