Thursday, 13 June 2019

जात पडताळणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम शैक्षणिक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य 

वृत्त क्रमांक-361                                              दि.13 जून 2019  

 

जात पडताळणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम

शैक्षणिक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य 

उस्मानाबाद, दि.13:- सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, उस्मानाबाद या समितीकडून दि. 20 मार्च ते 15 जून 2019 या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी विशेष मोहिमेद्वारे शैक्षणिक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येत आहे. अर्जदारांच्या प्रकरणांवर समितीला लवकरात लवकर निर्णय घेणे शक्य व्हावे, यासाठी नियम 2012 मधील नियम क्रमांक 17 (2) (3) नुसार कागदोपत्री पुरावे, शपथपत्र, इतर आवश्यक दस्तावेज अद्याप दाखल केले नसल्यास व अर्जदारांच्या ज्या प्रकरणात त्रुटी आहेत, अशा अर्जदारास समितीकडून त्रुटींची पूर्तता करण्यासाठी त्रुटीची पत्र पाठविण्यात आले आहे. अशा अर्जदाराने तातडीने समितीकडे त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित कागदपत्रे सादर करावीत.
 शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव संबंधित महाविद्यालयामार्फत पडताळणी समिती कार्यालयात प्राप्त झालेले आहेत. मात्र ज्यांना समितीकडून त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत,अशा विद्यार्थ्यांनी दि. 15 जून रोजी कार्यालयात येऊन त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी, उस्मानाबाद यांनी केले आहे. तसेच अर्जदार यांना वारंवार संपर्क करुनही जे अर्जदार प्रकरणांच्या त्रुटींची पूर्तता करणार नाहीत, त्यांचे अर्ज वरील नियमानुसार निकाली काढण्यात येतील, याची नोंद घ्यावी. अर्जदार यांनी स्वतः अथवा त्यांचे आई-वडील, भाऊ-बहीण यांच्यासह कार्यालयाशी संपर्क साधावा, त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही या कार्यालयाशी संपर्क साधू नये,असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्वाती इथापे यांनी केले आहे.    

***

वृत्त क्रमांक-362

वेटरन सेल नवी दिल्ली, येथे

माजी सैनिक/विधवा यांची नाव नोंदणी मोहीम सुरु

उस्मानाबाद,दि.13:-  माजी सैनिक/विधवा यांचे वेटरन सेल,(Veteran Cell ) नवी दिल्ली येथे नाव नोंदणी करण्याची मोहीम सुरु आहे. या नाव नोंदणीमुळे आपल्या अडीअडचणी वेळेत सोडविण्यात मदत होईल तसेच आर्थिक मदतसुध्दा वेळेत मिळणे सुलभ होईल.
 
 
 
तरी जिल्हयातील सर्व माजी सैनिक/विधवा यांनी वेटरन सेलचा फॉर्म भरुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावा, जेणेकरुन आपला फॉर्म या कार्यालयामार्फत पाठवून वेटरन सेल, नवी दिल्ली येथे नाव नोंदणी करणे सुलभ होईल.
तरी सर्व माजी सैनिक /विधवा यांनी हे फॉर्म लवकरात लवकर भरुन दयावेत,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर फिरासत  यांनी केले आहे.
                                                  ****
वृत्त क्रमांक-363   
 

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक यांचा

 जून  महिन्यातील  बैठक / दौरा कार्यक्रम रद्द

 

उस्मानाबाद,दि.13:- जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक यांचा माहे जून 2019 मधील सहामाही बैठकीच्या संदर्भात परांडा, उमरगा, वाशी, लोहारा व उस्मानाबाद  येथील तहसील कार्यालयामध्ये आजी-माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठीचा नियोजित दौरा प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आला आहे, याची सर्व आजी माजी सैनिक, विधवा व त्यांचे कुटुंबीय यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर फिरासत  यांनी केले आहे.

***

वृत्त क्रमांक-364  

केंद्रीय सैनिक बोर्डाकडून  आर्थिक मदतीसाठी

माजी सैनिक/विधवा/ पाल्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत

उस्मानाबाद,दि.13:- सन 2019-20 मध्ये माजी सैनिक, विधवांच्या पाल्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून आरएमडीएफ/एएफएफडीएफ मधून हवालदार पदापर्यंतच्या माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी ऑनलाइन प्रकरणे सादर करावयाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत--
1) चरितार्थाची आर्थिक मदत वय वर्ष 65 व पेन्शन नसलेल्या माजी सैनिकांसाठी वार्षिक रुपये 48हजार, वर्ष 2019-20, ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख- 1 मार्च 2020, 2) शिक्षणाची आर्थिक मदत, प्रथम व द्वितीय पाल्यास रुपये 12हजार प्रत्येकी, इयत्ता पहिली ते नववी व अकरावी, ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि.30 सप्टेंबर 2019, इयत्ता दहावी व बारावी, अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि.30 ऑक्टोबर 2019,बीए,बीकॉम,
 
 
 
 
बीएस्सी, ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि.30 नोव्हेंबर 2019, 3) मुलीच्या लग्नाकरिता आर्थिक मदत एका मुलीच्या लग्नासाठी रुपये पन्नास हजार, विवाहाच्या तारखेनुसार ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठीचा अवधी लग्नानंतर 180 दिवसांच्या आत, 4) अंत्यविधीची आर्थिक मदत एकावेळी रुपये 5हजार, मृत्यू दिनांकानुसार ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मृत्यू दिनांकानंतर 365 दिवसाच्या आत, 5) अनाथ मुलांसाठी आर्थिक मदत वार्षिक रुपये बारा हजार, याकरिता मुदत नाही, 6)  शंभर टक्के मतिमंद, अपंग पाल्यासाठी आर्थिक मदत, वार्षिक रुपये बारा हजार, याकरिता मुदत नाही, 7) वैद्यकीय मदत, रुपये तीस हजार ते रुपये 1 लाख 25हजार,  हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचा कालावधी- हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्याच्या तारखेपासून सहा महिने पर्यंत.
तरी गरजू माजी सैनिक अथवा विधवा आणि त्यांचे पाल्य  यांनी   ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर फिरासत  यांनी केले आहे.           

***

 
वृत्त क्रमांक-365  

  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील

युवक-युवतींसाठी मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

उस्मानाबाद,दि.13:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या योजनेंतर्गत जिल्ह्यात सन 2019-20 च्या प्रशिक्षणार्थींची (70 टक्के पुरुष व 30 टक्के महिला) पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी निवड करावयाची आहे.
जिल्ह्यातील वरील संवर्गातील इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या, 18 ते 25 वयोगटातील युवक-युवतींनी आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज करावेत. यासाठी उमेदवाराला महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवार हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा, उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा, उमेदवारांची उंची पुरुष-165 सेंटीमीटर व महिला-155 सेंटीमीटर इतकी असावी, पुरुषांसाठी छाती-79 सेंटीमीटर व फुगवून 84 सेंटीमीटर असावी, उमेदवारांकडे सर्व शैक्षणिक कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
निवड केलेल्या युवक-युवतींना प्रशिक्षणासाठी श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे तीन महिन्यांच्या मोफत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल.
 तरी  जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील इच्छुक उमेदवारांनी दि. 14 जून 2019 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्या कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी केले आहे.   

      

 

 

 

वृत्त क्रमांक-366                                                दि.13 जून 2019

 

कळंब येथील फटाका कारखाना स्फोटाबाबत चौकशीकरिता

उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती

उस्मानाबाद,दि.13:- कळंब पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फेरोज फायर वर्क्स, भोगजी रोड, कळंब येथे आयुब युनुस अत्तार यांच्या नावे असलेल्या परवाना क्रमांक 2/94 या फटाक्याच्या कारखान्यात  दि. 19 मे 2019 रोजी दुपारी साडेचार वाजता अचानक स्फोट होऊन फिरोज आयुब अत्तार आणि सलमा शेख या दोन व्यक्ती मयत झाल्या होत्या.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्हा दंडाधिकारी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 176 अन्वये दंडाधिकारीय चौकशीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, कळंब यांची नियुक्ती केली आहे. या चौकशीबाबत उपविभागीय दंडाधिकारी यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (2/1974) मधील  दंडाधिकारी; चौकशीसाठी जे अधिकार आहेत ते सर्व अधिकार असतील. तसेच विस्फोटक अधिनियम 1884 च्या कलम 7 च्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमान्वये  चौकशी अधिकारी म्हणून त्यांना अधिकार असतील.  
संबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी एक महिन्याच्या आत या घटनेचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

*** 

वृत्त क्रमांक-367  

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा

गरोदर व स्तनदा मातांनी लाभ घ्यावा

उस्मानाबाद,दि.13:- गरोदर व स्तनदा मातांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र व महाराष्ट्र शासनाची लाभदायक योजना असून बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी तसेच सुदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, या दृष्टीकोनातून ही योजना राबविण्यात येते.  
 ही योजना दि. 1 जानेवारी 2017 पासून सुरू करण्यात आलेली असून या योजनेंतर्गत गरोदर व स्तनदा माता यांना पहिल्या जिवंत अपत्यासाठी तीन टप्प्यात एकूण पाच हजार रुपये मातेच्या बँक किंवा पोस्ट खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा केले जातात. त्यासाठी आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेत किंवा किंवा आशा स्वयंसेविका यांना भेटून त्यांना आवश्यक ती कागदपत्रे देण्यात येणे बंधनकारक आहे.  त्यामध्ये पहिल्या लाभासाठी गरोदरपणाची नोंद आरसीएच पोर्टल मध्ये एएनएम यांच्याकडे मासिक पाळी चुकल्यानंतर 100 दिवसाच्या आज कोणत्याही शासकीय
 
 
 
आरोग्य संस्थेत करणे बंधनकारक आहे, गरोदर मातेची नोंदणी केलेल्या माता व बालसंगोपन कार्डची झेरॉक्स, मातेचे आधारकार्ड, पतीचे आधारकार्ड आणि मातेचे बँक किंवा पोस्ट खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स इत्यादी आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर पहिला हप्ता रुपये 1000/- मातेच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जातात , दुसऱ्या हप्त्यासाठी गरोदर मातेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर व किमान एक प्रसूतिपूर्व गरोदर तपासणी करणे बंधनकारक असून या गरोदर तपासणी केलेल्या माता बाल संगोपन कार्ड मधील गरोदर तपासणी पानाची झेरॉक्स दिल्यानंतर दुसरा हप्ता रुपये 2000/- मातेच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जातात, तिसऱ्या लाभासाठी प्रसूतीनंतर बाळाचे प्राथमिक स्वरूपाचे लसीकरण पूर्ण केल्यानंतर बाळाचे जन्म प्रमाणपत्र व लसीकरण पूर्ण केलेल्या माता बालसंगोपन कार्ड मधील पानाची झेरॉक्स दिल्यानंतर तिसरा हप्ता रुपये दोन हजार मातेच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जातात. असे एकूण तीन टप्प्यात संबंधित मातेच्या खात्यामध्ये रुपये पाच हजाराची रक्कम जमा केली जाते. हा लाभ ह्या मातेच्या सकस आहारासाठी व बुडीत मजुरीसाठी देण्यात येतो, परंतु या तीनही बाबींसाठी लाभार्थीच्या शेवटच्या मासिक पाळीच्या दिनांकापासून ते पुढे 730 दिवसाच्या आतच अर्ज दाखल करणे बंधनकारक आहे.
ही योजना सुरू झाल्यापासून ते दि. 5 जून 2019 पर्यंत उस्मानाबाद ग्रामीण व शहरी भागात एकूण पंधरा हजार 263 गरोदर व स्तनदा मातांच्या खात्यामध्ये रुपये पाच कोटी 36 लाख 84 हजार इतकी रक्कम डीबीटी द्वारे जमा करण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य संस्था, एएनएम, आशा स्वयंसेविका यांच्याशी संपर्क साधावा व प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.डी वडगावे यांनी केले आहे.
                                                                       ***

वृत्त क्रमांक-368

महिला लोकशाही दिनाचे

17 जून रोजी आयोजन

उस्मानाबाद, दि.13:- समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा, या दृष्टीने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून राज्य स्तरावर, विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिन ही संकल्पना राबविण्यात येते. या अनुषंगाने सोमवार,दि. 17 जून

 

 

 

 

रोजी सकाळी ठीक अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

  तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तर जिल्हा स्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी या महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाचा दिवस महिला लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येतो.

या महिला लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले, सेवाविषयक व आस्थापनाविषयक, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर या विषयावरील अर्ज स्वीकारले जात नाहीत.

जिल्हा स्तरावरील महिला लोकशाही दिनाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी असून सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ महिला, वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी तर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहतात.

तालुकास्तरावर प्राप्त प्रकरणांवर कार्यवाही होऊन तक्रारीचे निराकरण न झाल्यास ती प्रकरणे जिल्हास्तर महिला लोकशाही दिनामध्ये विचारार्थ घेतली जातात. लोकसभा निवडणूक  आदर्श आचार संहितेमुळे मागील तीन महिने महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले नव्हते.

या लोकशाही दिनात महिलांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी/निवेदन विहित नमुन्यात स्वीकारल्या जाणार आहेत. अर्जाचा विहित नमुना जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद ,प्रशासकीय इमारत, तळमजला येथे कार्यालयीन वेळेत विनामूल्य प्राप्त करून घेता येतील. या महिला लोकशाही दिनाचा गरजू महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. अशोक सावंत यांनी केले आहे. 

 

***  

वृत्त क्रमांक-369

 

पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत

जिल्हा प्रयोगशाळा नूतन इमारतीचे होणार उद्घाटन

उस्मानाबाद, दि.13:- पाणी गुणवत्ता व सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांचे वर्कशॉप, तुळजापूर नाका, पोहनेर रोड या नव्या इमारतीचे उद्घाटन आज दि. 14 जून रोजी सकाळी 11 वाजता
 
 
 
 
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते हे प्रमुख पाहुणे म्हणून तर कार्यकारी अभियंता राजकुमार पांडव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता मिशन) श्री. मधुकर देशमुख, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे उपसंचालक पी. एल. साळवे, वरिष्ठ भूवैज्ञानिक बी.एम. ठाकूर, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) ए. एस.कोळी, वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड, उपअभियंता प्रशांत बुरडे, सहायक भूवैज्ञानिक श्रीमती डॉ. मेघा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.