Wednesday, 22 November 2017

“वाचाल तर वाचाल” हे केवळ सुभाषितापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरावे -माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे






उस्मानाबाद.दि.22:-  ग्रंथांच्या माध्यमातून संतांनी आपला समाज घडविला. अध्यात्मातून मन घडविले गेले, खऱ्या रुपाने पुस्तकातून आपल्याला मार्गदर्शन मिळते, मात्र वाचाल तर वाचाल हे केवळ सुभाषितापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरावे, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले.
आनंदनगर येथील सांस्कृतिक सभागृह येथे महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रंथोत्‍सव- 2017’ च्या समारोप प्रसंगी श्री. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे बोलत होते.
यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी श्री विशाल पवार, अप्पर कोषागार अधिकारी श्री. आप्पासाहेब पवार, नायब तहसिलदार श्री. संतोष पाटील, पराग कोडगुले, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष श्री.व.ग.सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.अ.वा.सुर्यवंशी, श्री. के. व्ही. सरवदे, ॲङ वा.मा. वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी पुढे बोलताना श्री. ढोबळे म्हणाले की, ग्रंथाच्या माध्यमातून संतानी आपला समाज घडविला. अध्यात्मातून मन घडविले गेले, खऱ्या रुपाने पुस्तकातून आपल्याला मार्गदर्शन मिळते. वाचकाची आवडनिवड बदलते आहे, त्यानुसार पुस्तकांची गरजही निर्माण झाली आहे. आजच्या इंटरनेट जगात ई-बुकच्या माध्यमातून वाचक आपली वाचनाची भूक भागवित आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन घडते. लेखकाच्या प्रतिभेतून आईची मायाचा पाझरत असते. यातून ग्रंथ चळवळ मोठी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करुन यासाठी साताऱ्यातील भिलार या पुस्तकाच्या गावाचे अनुकरण करावे असेही त्यांनी सांगितले.
भूतकाळाची ओळख, वर्तमानात काय घडतय आणि भविष्यात काय घडणार आहे हे सप्रमाण सांगण्याची ताकद पुस्तकातच आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल न देता त्यांच्यावर संस्कार करणारे एखादे पुस्तक पुस्तक दयावे,असेही प्रा.ढोबळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष श्री.व.ग.सुर्यवंशी, जिल्हा कोषागार अधिकारी श्री. विशाल पवार, ग्रंथ चळवळीतील कार्यकर्ता तसेच पत्रकार सुभाष पाटोळे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. 
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार श्री.डेंगळे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचलन श्री. ज्ञानेश्वर पाटील आणि अभिलाष लोमटे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुका ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी ग्रंथप्रेमी, साहित्यप्रेमी, विद्यार्थी, ग्रंथचळवळीतील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.