Wednesday, 24 May 2017

“जलयुक्त शिवार,गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” च्या लोकचळवळीतून महाराष्ट्रात जलक्रांती घडेल - जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे




उस्मानाबाद,दि.24:- सन 2019 पर्यंतटंचाईमुक्त महाराष्ट्रहे  शासनाचे ध्येय आहे. जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्रात यशस्वी झाले यात लोकसहभाग मोठया प्रमाणात वाढला आहे,याच लोकचळवळीतून महाराष्ट्रात जलक्रांती घडेल, असे प्रतिपादन जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज येथे केले.
            गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत लोकसहभागातून गाळ काढणे कामाचा शुभारंभ परंडा तालुक्यातील कंडारी येथे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे,जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.नाथ,लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.कांबळे जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष ॲड सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे म्हणाले की,जलयुक्त शिवार अभियान हे राज्यात  यशस्वी झाले असून आतपर्यंत राज्यातील 11 हजार 494 गावात ही योजना राबविली आसून या वर्षात 5 हजार गावात राबविण्यात येतआहे तर पुढच्या वर्षात 10 हजार गावात ही योजना राबविण्यात येणार आहे.यासाठी 4 हजार कोटी विशेष अनुदानातून खर्च करण्यात येत आहे.पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब आपण वाचवूया व शाश्वत पाणी स्त्रोत निर्माण करु या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            या अभियानासाठी 550 कोटी पेक्षा जास्त निधी लोकसहभागातून उभा राहिला आहे.शेतकऱ्यांच्या शेतात गाळ टाकण्यासाठी शासनाचाही सहभाग असणार असून यात डिझेलसाठी शासनाकडून 25 कोटीची निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेवून काम करणारे हे शासन आहे असेही प्रा. शिंदे यावेळी म्हणाले.
            आमदार सुजितसिंह  ठाकूर यावेळी बोलताना म्हणाले की, जिल्हयात जलयुक्त शिवारचे काम चांगले झाले आहे आता गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या कामाचा शुभारंभ झाला असून यातदेखील लोकसहभाग वाढत आहे.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धरणातील गाळ टाकून जमीन सुपीक करावी व गाळमुक्त धरण करावे, जेणेकरुन, धरण गाळमुक्त केल्याने धरणाचा पाणीसाठा वाढेल व गाळ शेतात टाकल्याने जमिनीचा पोत सुधारेल व जमीन अधिक सुपीक होईल.
            त्याचबरोबर कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेंतर्गत या भागाला हक्काचे पाणी येणार असून येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वासआमदार श्री.ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक लघु सिंचन (जलसंधारण) विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.कांबळे यांनी केले. यावेळी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व  ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.