Saturday, 6 June 2026

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर १३ पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव धाराशिव,कळंब,भूम,वाशी आणि परंडा तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर १३ पाटबंधारे प्रकल्पांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव धाराशिव,कळंब,भूम,वाशी आणि परंडा तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाराशिव दि.६ जून (जिमाका) संभाव्य अल निनो परिस्थितीमुळे यंदाचा पर्जन्यमान लांबण्याची शक्यता व भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव,कळंब,भूम, वाशी आणि परंडा तालुक्यातील १३ पाटबंधारे प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जारी केले आहेत. कार्यकारी अभियंता,धाराशिव पाटबंधारे विभाग क्रमांक १ यांच्या अहवालानुसार,एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून संबंधित प्रकल्पांतील उपलब्ध पाणीसाठा नागरिकांच्या पिण्याच्या गरजांसाठी सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आदेशानुसार धाराशिव तालुक्यातील अंबेहोळ साठवण तलाव प्रकल्प, उपळा साठवण तलाव क्रमांक १, उपळा साठवण तलाव क्रमांक ३ आणि शेकापूर साठवण तलाव प्रकल्प,कळंब तालुक्यातील कोठेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प आणि चोराखळी साठवण तलाव प्रकल्प,भूम तालुक्यातील नांदगाव साठवण तलाव प्रकल्प, बारगाव प्रकल्प आणि जांब लघु पाटबंधारे प्रकल्प,वाशी तालुक्यातील बोरगाव बृहत लघु पाटबंधारे प्रकल्प आणि ई-याचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प, तसेच परंडा तालुक्यातील वाटेफळ साठवण तलाव प्रकल्प आणि साकत मध्यम प्रकल्प यांतील उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,संबंधित प्रकल्पांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध नसल्याने या जलस्रोतांमधून अवैध पाणी उपसा होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अवैध पाणी उपसा तातडीने बंद करून उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्याच्या वापरासाठी जतन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही विचार करून संबंधित प्रकल्पांतील उपलब्ध पाणी राखीव ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.उपलब्ध जलसाठा अधिकाधिक काळ टिकून राहावा आणि नागरिकांना दीर्घकाळ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, धाराशिव,कळंब,भूम,वाशी आणि परंडा तालुक्यातील वरील १३ पाटबंधारे प्रकल्पांमधील सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्यासाठी आरक्षित राहणार असून,या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. *****