उस्मानाबाद,दि. 23:- जिल्ह्यास सन 2016-17
साठी 44 लाख रुपयांचे ध्वजदिन निधीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हयाने 113.18
टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांनी सर्वांचे अभिनंदन करुन समाजातील प्रत्येक घटकाने सैनिक व
त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी तत्पर राहावे असे प्रतिपादन केले.
सन 2017 च्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी
संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 21
डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आला
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस
अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले,
कमांडर गुरुदत्त सालोखे, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग
नियंत्रक राजीव साळवे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रावसाहेब
चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार हे उपस्थित होते .
श्री. गमे पुढे म्हणाले की, देशावरील संकटांवर
मात करण्यासाठी सर्वांनीच सज्ज असणे आवश्यक असते मात्र सैनिकांमुळे आपली जबाबदारी
बऱ्याच प्रमाणात कमी होते. आपण सर्वजण या सैनिकांमुळेच सुरक्षित जीवन जगत आहोत.
आजी-माजी सैनिकांच्या प्रशासनिक तसेच सामाजिक कामांसाठी ते किंवा त्यांचे कुटुंबिय
जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांचा
योग्य तो आदर करुन त्यांना प्राधान्याने मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे. आपण
सर्वांनी मिळून त्यांचे प्रश्न सोडवूया.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तसेच
बिगुल वाजवून शहीदांना श्रध्दांजली वाहून करण्यात आली. यानंतर विशेष कार्यक्रम
म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी शहिदांवर आधारित “शहीद कॅप्टन विनायक गोरे” या
देशभक्तीपर एकपात्री नाटिकेचे सादरीकरण केले. या नाटिकेच्या माध्यमातून त्यांनी
उपस्थितांना आवाहन केले की, आपण देशाची सेवा ही कोणत्याही माध्यमातून करु शकतो,
त्यासाठी फक्त प्रामाणिक इच्छाशक्ती हवी.
प्रास्ताविकात बोलताना जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले म्हणाले की , परकीय आक्रमणापासून
देशाचे संरक्षण करताना , अंतर्गत शांतता व सुव्यवस्था
प्रस्थापित करताना शूर सैनिक स्वत:च्या परिवारापासून हजारो मैल
अंतरावर राहून देशसेवा करीत असताना कित्येक सैनिक हुतात्मे होतात तसेच
त्यांना अपंगत्व येते . अशा या शूर सैनिकांबद्दल कृतज्ञता व
सद्भावना व्यक्त करुन त्यांचे ऋण फेडण्याच्या उदात्त
भावना व्यक्त करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन
निधी संकलित करुन सैनिकांच्या कल्याणकारी योजना या
निधीतून राबविण्यात येतात. अशा या सैनिकांच्या व राष्ट्राचा मानबिंदू
असणाऱ्या ध्वजाचा ध्वजदिन निधी संकलन दरवर्षी करण्यात येते . याचे
औचित्य साधून शहीद सैनिकांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. कॅप्टन सुनिल
गोडबोले यांनी ध्वजदिनाचे महत्व तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत
राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी उपस्थितांना माहिती सांगितली.
यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील शहीद वीरांच्या
वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांचा तसेच ध्वजनिधी उद्दिष्टपूर्तीचे
सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि विविध कार्यालयप्रमुखांचा शाल,
श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सैनिकांना व त्यांच्या
कुटुंबियांना त्यांच्या गरजेनुसार विविध बाबींसाठी अर्थसहाय्याचे धनादेश वितरण
करण्यात आले. यामध्ये दिनांक 01 डिसेंबर
2017 पर्यंत जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे 01 लाभार्थ्यांस 75 हजार, मुलीच्या
विवाहासाठी 03 लाभार्थ्यांना 20 हजार, अंत्यविधीसाठी 10 लाभार्थ्यांना 65 हजार, एस
टी पास प्रवास खर्चासाठी 10 लाभार्थ्यांना 32 हजार 274, मतिमंद पाल्य 01
लाभार्थ्यांस 3 हजार 600, शालेय शिक्षण मदत 01 लाभार्थ्यांस 2 हजार 400,
महाविदयालयीन शिक्षण मदत 03 लाभार्थ्यांना
23 हजार, व्यवसायीक शिक्षण मदत 19
लाभार्थ्यांना 2 लाख 84 हजार, शिष्यवृत्ती विद्यावेतन 5 लाभार्थ्यांना 10 हजार
500, MSCIT खर्च प्रतिपूर्ती 1
लाभार्थ्यांस 2 हजार 500, सैनिकी शाळेच्या खर्चाकरीता 1 लाभार्थ्यांस 32 हजार,
अशासकीय कर्मचारी वेतन 5 लाभार्थ्यांस 59 हजार 725, सेवापूर्व प्रशिक्षण मदत 1
लाभार्थ्यांस 2 हजार अशा प्रकारे आर्थिक
मदतीचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या बरोबरीनेच
समाजातील विविध घटकांनीही सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी चांगले योगदान द्यावे,
असे आवाहन उपस्थितांना केले.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सैनिकांसाठी
आपण एका विशिष्ट दिवशीच महत्व न मानता कायमच आपल्या मनात त्यांच्याविषयी आदर असावा
आणि त्यांना शक्य होईल ती मदत करण्याची भावना असावी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शेंडगे यांनी
केले तर आभार प्रदर्शन एम.एच. वाघमारे यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध
कार्यालयाचे कार्यालय प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी , माजी सैनिक संघटना,
नागरिक, माजी सैनिक -विधवा बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी या कार्यक्रमाची
सांगता राष्ट्रगीताने झाली.

