उस्मानाबाद,दि.30:- मानसिक, शारिरिक, सामाजिक, आर्थिकदृष्टया
समाधानी असणे म्हणजे आरोग्य चांगले असणे होय, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. एकनाथ माले यांनी आज केले.
जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.माले बोलत
होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व तहसिलदार राजकुमार माने यांची उपस्थिती होती. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्री. गलांडे,
आयएमए सदस्य डॉ.राजगुरू, फोग्सीचे सदस्य डॉ.
सुशिलकुमार सरडे, निवासी वैद्यकीय अधिकारी
डॉ. प्रताप शिंदे, डॉ. जिंतूरकर, डॉ.नीता
चौगुले, डॉ.पोळ, डॉ.जाधव आदीची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ.माले म्हणाले की, अनेक रोगाचा
आपण नायनाट करु शकलो याचे श्रेय समाजातील सर्वच नागरिकांना आहे. नुसत्या घोषणा
करुन चालणार नाही त्याला प्रत्यक्ष कृतीची
जोड दयावी. काम करताना काळजी घ्यावी, संसर्ग होवू नये म्हणून काळजी घ्यावी,
बायोमेडिकल वेस्ट योग्यरित्या त्याची विल्हेवाट लावावी. चांगल्या कामांना मनापासून
करण्याचा प्रयत्न करावा.व्यसनापासून दूर राहावे, स्वच्छतेची कास धरा व इतरांनाही
प्रोत्साहित करा,त्याचबरोबर प्रत्येकाने दरवर्षी आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी.
आरोग्य विभागाच्या विविध
उपक्रमात सहभाग नोंदविल्याबद्दल रिक्षाचालकांचे विशेष कौतुक डॉ.माले यांनी यावेळी
केले.
यावेळी तहसिलदार श्री. माने
यांनी शासकीय आरोग्य योजनांची माहिती घेवून जागरुक व्हावे आणि सकारात्मक जीवन
जगावे, असे सांगितले.
निवासी वैद्यकीय अधिकारी श्री.शिन्दे
यांनी एचआयव्हीबाधितांना प्रशासनाने त्रस्त कुटूंबात समाविष्ट करुन त्यांना विविध
शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात हा जिल्हा पहिला असल्याबद्दल जिल्हाधिकारी राधाकृष्ण
गमे यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यमानंतर महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांची जनजागरण फेरी काढण्यात
आली. या फेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला. उपस्थित मान्यवरांनी जनजागरण रॅलीस हिरवा
झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ केला. विविध नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, डॉक्टर्स,
नर्सेस व इतर कर्मचारी या फेरीत सहभागी झाले होते. एड्स दिनानिमित्त
विद्यार्थ्यांना सामुहिक शपथ देण्यात आली.
प्रारंभी सर्व यांच्या हस्ते धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
गणेश काकडे यांनी केले तर आभार डॉ.नीता चौगुले यांनी व्यक्त केले.सुत्रसंचलन संतोष
पोतदार यांनी केले. या कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया
संख्येने सहभागी झाले होते.