Monday, 22 August 2016

कृषी विज्ञान केंद्रातील शेतकरी प्रशिक्षणवर्ग झाला राज्यातील पहिला लोकराज्य शेतकरी प्रशिक्षण वर्ग


उस्मानाबाद,दि.22:- राज्यातील या वर्षातील पहिला लोकराज्य शेतकरी प्रशिक्षण वर्ग  बनण्याचा मान  उस्‍मानाबादमधील कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर या संस्थेत बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतक-यांसाठी आयोजित जगप्रसिध्द कडकनाथ कोंबडीपालन प्रशिक्षण वर्गाने पटकाविला आहे. या प्रशिक्षण वर्गामधील  एकूण 34 प्रशिक्षणार्थ्यांनी  तसेच कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर या संस्थेचे प्राचार्य ,सर्व प्राध्यापक शास्त्रज्ञ, कर्मचाऱ्यांनी  लोकराज्य चे वार्षिक सभासदत्व स्वीकारले आहे
            जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप हे या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून या संस्थेत उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना इतर मार्गदर्शनासोबतच माहिती जनसंपर्क विभागाचे  उपक्रम, लोकराज्य मासिक, महान्यूज वेबपोर्टल यांचे  महत्व आणि उपयोगिता  समजावून सांगितली तसेच संपूर्ण प्रशिक्षण वर्गाने व कृषी विज्ञान केंद्रातील  सर्व अधिकारी कर्मचा-यांनी  लोकराज्य चे सभासदत्व स्वीकारावे असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला कृषी विज्ञान केंद्र व शेतकरी प्रशिक्षणार्थ्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद  देवून लोकराज्य चे सभासदत्व स्वीकारले.
यातील काही शेतकरी प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,आम्ही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग आमच्या गावात शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी करूच व त्या माध्यमातून गावाचा विकासही साध्य करू. यावेळी जगप्रसिध्द कडकनाथ कोंबडीपालन  या व्यवसायातून  मिळालेल्या यशाची कहानी एक दिवस लोकराज्य मासिकात प्रकाशित होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी  आत्मा चे प्रकल्प संचालक विजय लोखंडे, उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राचे प्रमुख संजय बरीदे ,वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कृषी विज्ञान केंद्र,तुळजापूरचे प्रमुख प्रा.डॉ.सचिन सुर्यवंशी,  डॉ.अनिता जिंतूरकर, शास्त्रज्ञ (पशुविज्ञान) हे उपस्थित होते